*कोंकण एक्सप्रेस*
*उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे ‘जागतिक हिवताप दिन’ उत्साहात साजरा; २०२७ पर्यंत मलेरिया मुक्त भारताचे ध्येय*
*कणकवली ः संजना हळदिवे*
आज २५ एप्रिल रोजी उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे ‘जागतिक हिवताप दिन’ (World Malaria Day) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने नागरिकांमध्ये मलेरिया या आजाराविषयी जनजागृती करण्यात आली.
जागतिक हिवताप दिनाचा इतिहास
मलेरिया हा आजार केवळ आफ्रिका खंडापुरता मर्यादित नसून तो एक जागतिक प्रश्न आहे, हे लक्षात घेऊन २००७ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) ६० व्या अधिवेशनात (World Health Assembly) एक महत्त्वाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यानुसार, पूर्वीचा ‘आफ्रिका मलेरिया दिन’ बदलून त्या जागी ‘जागतिक मलेरिया दिन’ साजरा करण्याचे ठरले. तेव्हापासून जगभरात २५ एप्रिल हा दिवस मलेरिया विरुद्धच्या लढ्याला बळ देण्यासाठी साजरा केला जातो.
भारत सरकारचे ‘मिशन २०३०’
हिवताप निर्मूलनासाठी भारत सरकारने अत्यंत महत्त्वाकांक्षी पावले उचलली आहेत. या मोहिमेअंतर्गत:
२०२७ पर्यंत: ‘मलेरिया मुक्त भारत’ करण्याचे उद्दिष्ट.
२०३० पर्यंत: देशातून मलेरियाचे पूर्णपणे ‘निर्मूलन’ करण्याचे लक्ष निर्धारित करण्यात आले आहे.
मोफत तपासणी आणि उपचार
कार्यक्रमादरम्यान आरोग्य अधिकाऱ्यांनी नागरिकांना आवाहन केले की, मलेरियाची लक्षणे दिसल्यास अंगावर न काढता त्वरित तपासणी करून घ्यावी. मलेरियावरील रक्त तपासणी आणि संपूर्ण औषधोपचार सर्व शासकीय दवाखान्यांमध्ये मोफत उपलब्ध आहेत.
“साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावा आणि डासांपासून स्वतःचे संरक्षण करा, हाच मलेरिया रोखण्याचा सर्वोत्तम उपाय आहे.” अशा संदेशासह या कार्यक्रमाची सांगता झाली.

