*कोकण Express*
*भास्कर जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी*
*अवमानास्पद वक्तव्य करणाऱ्यांचा राणे प्रेमींकडून निषेध*
*भाईंदर :-*
केंद्रीय मंत्री तथा भाजपा नेते नारायणराव राणे यांच्याबद्दल अवमानास्पद, शिवराळ तसेच चिथावणीखोर वक्तव्य केल्या बद्दल आमदार भास्कर जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी मीरा भाईंदर शहरातील स्वाभिमानचे जिल्हा अध्यक्ष मनोज राणे यांनी बुधवारी सकाळी नवघर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली असून भास्कर जाधव यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. आपल्या लाडक्या नेत्याचा अपमान आम्ही कधीच सहन करणार नाही असे देखील मनोज राणे यांनी सांगितले आहे.
सिंधुदूर्ग (कुडाळ) येथे मंगळवारी शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्यावरील ए.सी.बी. कारवाईच्या विरोधात ठाकरे गटाने ए.सी. बी. कार्यालयावर मोर्चा काढला होता. सदर मोर्चाच्या वेळी भाजपा नेत्यांबद्दल जाणीवपूर्वक शिवराळ भाषा वापरून तेढ निर्माण करणारी चिथावणीखोर वक्तव्ये, अत्यंत खालच्या दर्जाची आक्षेपार्ह गलीच्छ भाषा वापरण्यात आली होती. पोलीसांना त्यांच्या यंत्रणेद्वारे तसेच मिडीयाच्या माध्यमातून याबाबत माहिती मिळाली असेलच.केंद्रीय मंत्री नारायण राणे अनेकांचे प्रेरणास्थान असून त्यांना मानणारा मोठा वर्ग मीरा भाईंदर शहरात देखील आहे. नारायणराव राणे यांना आमदार भास्कर जाधव यांनी व्यासपीठावरुन जाहीरपणे शिवीगाळ करत बदनामी करणारी भाषा वापरली आहे. या घृणास्पद प्रकाराने राणे यांच्यावर प्रेम करणा-या असंख्य कार्यकर्त्या मध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असल्याचे मनोज राणे यांनी सांगितले आहे. नारायणराव राणे यांनी कोकणचेच नव्हे तर राज्याचे नेतृत्व केलेले आहे. सिंधुदुर्ग जिल्हयातील सर्व सत्तास्थाने गेली अनेक वर्षे एकहाती संभाळलेली आहेत. तसेच ते भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणून आज केंद्रात नेतृत्व करत आहेत.त्यामुळे आमदार भास्कर जाधव यांच्यावर कडक पोलीस कारवाई न केल्यास नारायण राणेच्या पाठीशी असणा-या कार्यकत्यांमध्ये जर असंतोष निर्माण झाला तर उद्भवणा-या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील याची नोंद घ्यावी आणि म्हणून या प्रकरणाचे गांभीर्य आणि संवेदनशीलता जाणून त्वरीत बेताल वक्तव्य करणा-या आमदार भास्कर जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी अशी विनंती मनोज राणे यांनी पोलिसांकडे केली आहे