*कोकण Express*
*फोंडाघाट महाविद्यालयात ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान संपन्न .*
*’माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान प्रत्येक घरापर्यंत पोहचवावे. – प्रा. डॉ. बालाजी सुरवसे*
नवरात्र हा स्त्री शक्तीचा जागर आहे. या उत्सवाच्या महत्वाशी सुसंगतच हे अभियान आहे. महिला शक्तीचे कुटुंबासह देशाच्या विकासात असलेले महत्वाचे स्थान लक्षात घेऊन ती सक्षम असावी यासाठी तिच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. तिच्या आरोग्याची काळजी घेऊन आपण तिच्याप्रती असणारी कृतज्ञता व्यक्त करूया! घरातील आणि परिसरातील महिलांनी आरोग्य तपासणी करावी यासाठी हे अभियान प्रत्येक घरापर्यंत पोहचवावे असे आवाहन राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा. डॉ. बालाजी सुरवसे यांनी केले.
फोंडाघाट महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व प्राथमिक आरोग्य केंद्र फोंडाघाट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ कार्यक्रमात प्रा. डॉ. सुरवसे म्हणाली की, घरातील स्त्री आपल्या कुटुंबासाठी विविध भूमिका अदा करत असताना तिचे स्वत:च्या प्रकृतीकडे दुर्लक्ष होते. कुटुंबाप्रति असणारी प्रेमाची भावना, मातृत्वाचा ओलावा आणि आपल्या कर्तव्याप्रति असणारी संवेदनशीलता यामुळे ती घरासाठी राबते, प्रसंगी स्वत:च्या गरजा, भावना, शरीर, प्रकृती याकडे लक्ष देत नाही. कुटुंबाची काळजी घेणाऱ्या माता-भगिनिंच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी राज्य शासनाने नवरात्रीच्या निमित्ताने ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान एकात्मिक बाल विकास सेवा योजना आणि आरोग्य विभाग यांच्या समन्वयाने हे अभियान राबविण्यात येत आहे.
राज्यातील १८ वर्षावरील महिलांना, मातांना, गरोदर स्त्रीयांना प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देणे आणि सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समूपदेशन सुविधा उपलब्ध करून देणे हे उद्दिष्ट आहे.
आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, सेवक यांच्यामार्फत घरोघरी जाऊन उपलब्ध सुविधेबाबत माहिती देण्यात येत आहे. ३० वर्षावरील सर्व महिलांचे कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, मोतीबिंदू, कान नाक घसा व इतर आजारांचे निदान व आवश्यकतेनुसार उपचार व समुपदेशन करण्यात येत आहे. अतिजोखमींच्या मातांचे/महिलांचे निदान करून त्यांना आवश्यकतेनुसार उपचार करण्याचे सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. गंभीर आजारावर महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना किंवा आयुष्मान भारत योजनेअंतर्गत शस्त्रक्रियादेखील करण्यात येणार आहेत.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा. डॉ. बालाजी सुरवसे, प्रा. संतोष आखाडे, प्रा. नम्रता मंचेकर, प्रा. प्रीती पाटील, कार्यालयीन अधीक्षक श्री. दिपक सावंत तसेच फोंडाघाट प्राथमिक आरोग्य केंद्रांतील समुदाय वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल कोल्हे, आरोग्य साहाय्यक श्री. दशरथ राणे, साै. मंदा राणे, आरोग्यसेविका साै. साक्षी नार्वेकर, साै. कांबळे, पूर्वा मेस्त्री, वेरोनिका पिंटो, आशा स्वयंसेविका साै. संचिता जाधव, साै. संजना सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले.