*कोंकण एक्सप्रेस*
*जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची आपले सरकार सेवा केंद्रांना भेट*
*_तळे बाजार व कणकवली येथील केंद्रांची पाहणी; नागरिकांशी संवाद साधत प्रणालीतील अडचणींचा घेतला आढावा_*
*सिंधुदुर्गनगरी, दि. १७ (जिमाका) :*
नागरिकांना शासनाच्या सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध व्हाव्यात यासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज तळे बाजार आणि कणकवली येथील आपले सरकार सेवा केंद्रांना भेट देऊन केंद्रांच्या कार्यपद्धतीची सविस्तर पाहणी केली. यावेळी त्यांनी सेवा केंद्र चालक, व्हीएलई (VLE) आणि नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून सेवा वितरण प्रक्रियेचा आढावा घेतला तसेच नव्या GPR 2 प्रणालीच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या.
पाहणीदरम्यान जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी केंद्र चालकांना शासनाने निश्चित केलेली आवश्यक कागदपत्रेच नागरिकांकडून मागविण्याच्या सूचना दिल्या. विशेषतः विद्यार्थ्यांना विविध दाखले व प्रमाणपत्रे वेळेत उपलब्ध होतील यासाठी दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. नागरिकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही यासाठी सेवा केंद्रांनी संवेदनशीलतेने आणि जबाबदारीने काम करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या भेटीदरम्यान केंद्र चालकांनी Government Process Re-engineering (GPR) संदर्भात प्रशिक्षणाची आवश्यकता असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावर सकारात्मक प्रतिसाद देत जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र चालकांसाठी प्रशिक्षणाची व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना दिले. सेवा केंद्र चालकांना नव्या प्रणालीचे अधिक प्रभावी ज्ञान मिळाल्यास नागरिकांना सेवा देण्याची गुणवत्ता अधिक उंचावेल, असेही त्यांनी सांगितले.
GPR 2 प्रणाली सुरू झाल्यानंतर लॉगिन समस्या, सर्व्हरची संथ गती, अर्ज प्रक्रियेत येणारे तांत्रिक अडथळे, दस्तऐवज अपलोड करताना निर्माण होणाऱ्या अडचणी तसेच विविध सेवांच्या प्रक्रियेत होणारा विलंब यासंदर्भातील अडचणी केंद्र चालकांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडल्या. राज्यातील अनेक भागांमध्ये अशा स्वरूपाच्या तांत्रिक अडचणींची नोंद झाल्याचेही यावेळी समोर आले.
जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी केंद्र चालकांच्या सूचना व समस्या गांभीर्याने ऐकून घेत संबंधित विभागांकडे त्या तातडीने पाठविण्याचे निर्देश दिले. तसेच नागरिकांना सेवा देताना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यावर भर दिला. सेवा केंद्रांमार्फत नागरिकांना वेळेत, दर्जेदार आणि विश्वासार्ह सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी आपले सरकार सेवा केंद्रांद्वारे विविध दाखले, प्रमाणपत्रे तसेच शासनाच्या ऑनलाइन सेवांचा लाभ अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचविण्याबाबत चर्चा करण्यात आली. शासनाच्या डिजिटल सेवा उपक्रमांना अधिक सक्षम बनवून नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास दृढ करण्यासाठी सर्व सेवा केंद्रांनी प्रयत्नशील राहावे, असेही जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.
यावेळी उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर, कणकवलीचे तहसीलदार दीक्षांत देशपांडे, देवगडचे तहसीलदार सूर्यकांत पाटील तसेच संबंधित अधिकारी व सेवा केंद्र चालक उपस्थित होते.

