बदली पास घोटाळ्यातील वनपालावर फौजदारी गुन्हा दाखल न केल्याने १ मे रोजी उपोषण

बदली पास घोटाळ्यातील वनपालावर फौजदारी गुन्हा दाखल न केल्याने १ मे रोजी उपोषण

*कोकण Express*

*बदली पास घोटाळ्यातील वनपालावर फौजदारी गुन्हा दाखल न केल्याने १ मे रोजी उपोषण*

सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार यांचा इशारा

*सावंतवाडी  ः प्रतिनिधी*

बदलीपास घोटाळ्यास जबाबदार असणार्‍या संबधित वनपालावर गुन्हा दाखल करण्याची मागणी कुडाळ पोलिसांकडे करुनही संबधितांवर अद्यापपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी कुडाळ पोलिस ठाण्यासमोर १ मे रोजी उपोषण छेडणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी दिला आहे.

सावंतवाडी वनविभागामधील कुडाळ वनक्षेत्रामधील माणगाव परिमंडळामध्ये बदलीपास रॅकेट असल्याचे समजल्याने सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी संबंधित कार्यालयांकडून माहितीच्या अधिकारात घोटाळ्यांमधील कागदपत्र प्राप्त करून घेतली होती. यात घोटाळा असलेली सुमारे १७ प्रकरणे निष्पन्न झाली होती. यातील एका प्रकरणात अर्जदाराला अंधारात ठेऊन अर्जदाराच्या बनावट सह्या करून बनावट पंचनामे केल्याचे सिद्ध झाले आहे. संबंधित मानकीदाराने या बदली पासाच्या अर्जावरील जबाबावरील तसेच पंचनाम्यावरील सह्या आपल्या नाहीत, असा जबाब सहाय्यक वनसंरक्षक, वनविभाग सावंतवाडी यांचे समोर लेखी जबाबात दिला आहे.

वनपालाने केलेली सदरची कृती ही फौजदारी स्वरूपाची होती. त्यामुळे पोलीस निरीक्षक कुडाळ पोलीस स्टेशन यांचे कडे ७ एप्रिल रोजी वनपाल मालवण यांचेवर फौजदारी गुन्हा दाखल करणेबाबत बरेगार यांनी रितसर अर्ज दाखल केला आहे.
दरम्यानच्या काळात वनक्षेत्रपाल कुडाळ यांचे कडे संबंधित मूळ मालकी प्रकरणांच्या प्रतीची मागणी केली असता, त्यामधील दोन प्रकरणे वनपाल मालवण यांनी न पुरविलेने ते देऊ शकत नाहीत, असे लेखी कळविले. याचाच अर्थ सदरची, पुराव्यासाठी उपयोगी ठरू शकणारी दोन प्रकरणे वनपाल मालवण यांनी गायब केली आहेत. सदरची बाब पोलीस निरीक्षक कुडाळ यांना लेखी कळवून देखील काहीही कारवाई केली नाही.

पोलीस निरीक्षक कुडाळ पोलीस स्टेशन, हे सदरचे प्रकरण गांभीर्याने घेत नसलेने २ एप्रिल रोजी या प्रकरणी नाईलाजास्तव कुडाळ पोलीस स्टेशन समोर उपोषणास बसत असल्याबाबतची नोटीस देण्यात आली आहे. या प्रकरणात वनपाल माणगांव यांनी केलेले कृत्य हे त्यांचे शासकीय कर्तव्याचा भाग नसल्याने त्यांचेवर फौजदारी गुन्हा दाखल करणेस वनखात्याची परवानगी घेणे आवश्यक नाही. तसे वनखात्याकडे सदरचे प्रकरण पाठवून अहवालाची वाट पहाणेची आवश्यकता नाही, या बाबतचा मा. ना. मुंबई उच्चन्यायालयाच्या आदेशाचा हवाला देखील दिला आहे.

इतके सर्व करून देखील, फिर्याद नोंद करून घेऊन न नोंदविलेस, १ मे २०२१ पासून घेऊन नोंद करेपर्यंत उपोषणास बसणार असलेबाबतची नोटीस बरेगार यांनी पोलीस निरीक्षक कुडाळ यांना लेखी स्वरूपात पाठवलेली आहे व त्याची प्रत, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, तसेच जिल्हापोलिस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांना पाठवलेली असून याबाबतची माहिती त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!