*कोकण Express*
*शनिवार पासून रास्त धान्य दुकाने बंद*
*आपल्या मागण्यांसाठी रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेचा निर्णय!*
*१ मे पासूनच्या बंद मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व रास्त धान्य दुकानदार होणार सहभागी!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव होत असून अलीकडेच वैभववाडी सोनाळी गावातील रास्त भाव धान्य दुकानदार भिकाजी पवार यांचे कोरोनाने निधन झाले. या पार्श्वभूमीवर अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक संघटनेने पुकारलेल्या १ मे पासूनच्या बंद मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व रास्त धान्य दुकानदार सहभागी होऊन रास्त धान्य दुकान बंद ठेवतील अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा व शहर रास्त भाव धान्य दुकानदार व रॉकेल धारक संघटनेचे जिल्हाध्यक्ष रुपेश पेडणेकर यांनी दिली.
दरम्यान, नागरिकांचा थम लावण्याची अट या कोरोना काळात रद्द करावी ही अट रद्द झाली तरच हा संप मागे घेण्यास आम्ही तयार असल्याचेही श्री पेडणेकर यांनी सांगितले.
दरम्यान, या संपाच्या पार्श्वभूमीवर ओरोस येथे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांसमवेत संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी संप मागे घेण्याचे आवाहन केले होते. मात्र संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक नागरिकाला कोरोना काळात रास्त धान्य दुकानावर येऊन थम लावण्याची अट रद्द करत नाही, तोपर्यंत हा संप मागे घेण्यात येणार नाही असा इशारा या बैठकीत देण्यात आला.या बैठकीला संघटनेचे जिल्हाध्यक्ष रुपेश पेडणेकर, सल्लागार रमाकांत कथा बाळू कुबल, कणकवली तालुका उपाध्यक्ष बाबू नारकर, मालवण तालुका अध्यक्ष सुनील मलये, जिल्हा उपाध्यक्ष कानोबा देसाई, वेंगुर्ले अध्यक्ष तात्या हाडये, बबन लोकरे, संजय मुळीक, प्रकाश बांदेकर, राजीव पाटकर, विजय सावंत, पांडुरंग पालव आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले त्यात म्हटले आहे की, अखंड राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ई पास मशीनवर कार्डधारकांची हम न घेता धान्य दुकानदारांच्या थमने धान्य वाटपास परवानगी मिळावी. राज्यातील 55 हजार स्वस्त धान्य दुकानदार कोविड या महामार्गाच्या काळात शासनाकडून कोणत्याही प्रकारचे विमा कवच नसल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या परवानाधारकांना कोणतीही आर्थिक मदत मिळत नाही.राज्यात कोरोना महामारीच्या काळात भूकबळी होऊ नये म्हणून अविरतपणे आपल्या जिवाची पर्वा न करता आम्ही धान्य वाटप केलेले आहे. याची आपल्याला पूर्णतः जाणीव आहेच.तरीसुद्धा वारंवार शासनाकडे निवेदन देऊनही शासनाकडून यासंदर्भात कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे ना विलाजास्तव संघटनेला 1 मेपासून सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य वितरण व वाटप बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे.
दरम्यान नागरिकांना फिरण्यावर बंदी आहे, प्रशासकीय कामात पंधरा टक्के उपस्थिती असे असताना मात्र, हजारो लोकवस्ती असणाऱ्या गावातील नागरिकांना थम साठी एकाच वेळी शेकडोंनी रास्त धान्य दुकानावर नागरिकांना बोलविणे कितपत योग्य आहे. असा सवाल संघटनेचे सल्लागार बाळू कुबल यांनी केला आहे.

