*कोकण Express*
*संपूर्ण कणकवली तालुक्यात १ ते १० मे दरम्यान जनता कर्फ्यु पाळला जाणार..*
*दवाखाने आणि मेडिकल दुकाने वगळता सर्व कडकडीत बंद*
*सभापती मनोज रावराणे यांची माहिती*
*कणकवली ः प्रतिनिधी*
संपूर्ण कणकवली तालुक्यात १ ते १० मे दरम्यान जनता कर्फ्यु पाळला जाणार आहे. यात दवाखाने आणि मेडिकल दुकाने वगळता सर्व बंद असणार आहेत. अशी माहिती सभापती मनोज रावराणे यांनी आज दिली.
कोरोनाचा होत असलेला विस्फोट आणि वाढते कोरोनाबाधितांचे मृत्यू याबाबत ठोस निर्णय घेण्यासाठी कणकवली पं. स. सभागृहात तहसीलदार रमेश पवार, सभापती मनोज रावराणे, उपसभापती प्रकाश पारकर, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत कणकवली शहराप्रमाणेच संपूर्ण कणकवली तालुक्यात १ ते १० मे दरम्यान जनता कर्फ्यु पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी पं स सदस्य दिलीप तळेकर, मिलिंद मेस्त्री, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे, प्रशांत बुचडे आदी उपस्थित होते. ब्रेक द चेन ला कणकवली तालुक्यात फारसा प्रतिसाद मिळत नसल्याची खंत तहसीलदार रमेश पवार यांनी व्यक्त केली. स्वयंस्फूर्तीने ही कोरोनाची साखळी तोडण्यासाठी तालुक्यात जनता कर्फ्यु जाहीर करणे गरजेचे आहे. खारेपाटण गावाचा कित्ता गिरवत प्रशासकीय नियम पाळून तालुक्यात स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यु जाहीर केल्यास तालुक्यातील वाढता कोरोनाचा फैलाव रोखण्यास मदत होईल. त्यामुळे सर्वांनी एकजुटीने जनता कर्फ्यु चा निर्णय घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
सभापती मनोज रावराणे यांनी तालुक्यातील बाजारपेठांमध्ये होत असलेली गर्दी रोखणे गरजेचे असल्याचे नमूद केले. कणकवली शहरात जनता कर्फ्युचा निर्णय झाला आहे. त्याच धर्तीवर तालुक्यातील बाजारपेठा असलेल्या गावांतील सरपंच व ग्रामसेवकांची तातडीची बैठक आज घेतली आहे. तालुका आणि आपला गाव सुरक्षित ठेवायचा असेल तर १ ते १० मे दरम्यान 1₹१० दिवसांचा स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यु पाळूया असे आवाहन सभापती मनोज रावराणे यांनी उपस्थितांना केले.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ यांनी तालुक्यातील कोव्हीड बाधितांची आकडेवारी विषद केली. मार्च आणि एप्रिल या मागील २ महिन्यात तालुक्यात २ हजारहून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. ४०० हुन अधिक रुग्ण सक्रिय आहेत. दोन महिन्यांत ९५ जण मृत झालेत. दरदिवशी कोरोनाबाधित मृत्यू तालुक्यात होत आहेत. त्यामुळे आता सर्वांनीच अंतर्मुख होऊन ठोस निर्णय घेणे गरजेचे असल्याचे डॉ पोळ यांनी सांगितले.
पं स सदस्य दिलीप तळेकर यांनी गावातील सरपंचांची व्यथा मांडताना कोरोनाबद्दल शासकीय नियमांचे पालन करत असताना व्यापारी आणि सरपंच यांच्यातील होत असलेले वाद विशद केले. जनता कर्फ्यु पाळत असताना पोलीस, पं. स. आणि तहसीलदार यांचे स्वतंत्र पथक बनवावे आणि जनता कर्फ्युचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी आणि आदर्श जनता कर्फ्यु यशस्वी करूया असे मनोगत व्यक्त केले. यावेळी कणकवली तालुक्यातील बाजारपेठ असलेल्या गावांतील सरपंच, ग्रामसेवकांना या बैठकीला निमंत्रित करण्यात आले होते. खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत, असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, नांदगाव सरपंच अफ्रोजा नावलेकर, फोंडाघाट सरपंच संतोष आग्रे, वरवडे सरपंच प्रभाकर बांदल, कोळोशी सरपंच हृतिका सावंत, आदिंसह ग्रामसेवकही उपस्थित होते.