_गुरु तेग बहादूर यांच्या शौर्यगाथेचे समूहगानातून अभिवादन_*

_गुरु तेग बहादूर यांच्या शौर्यगाथेचे समूहगानातून अभिवादन_*

*कोंकण एक्सप्रेस*

*_गुरु तेग बहादूर यांच्या शौर्यगाथेचे समूहगानातून अभिवादन_*

*‘हिंद दी चादर’ शहीदी समागम वर्षानिमित्त कणकवलीत प्रेरणादायी उपक्रम*

*सिंधुदुर्गनगरी, दि. २३ फेब्रुवारी (जिमाका) :-*

श्री गुरु तेग बहादूर यांनी तत्कालीन शासनकर्त्यांच्या अन्याय व अत्याचाराविरुद्ध आवाज उठवत धर्मस्वातंत्र्य आणि मानवी हक्कांसाठी आपले प्राण अर्पण केले. त्यांच्या या अद्वितीय बलिदानामुळे भारताच्या सांस्कृतिक व अध्यात्मिक अस्मितेचे रक्षण झाले. शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त शासन विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांचा गौरवशाली इतिहास जनतेपर्यंत पोहोचवत आहे. आजच्या समूहगानातून आपण गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करत असून या उपक्रमातून नवप्रेरणा मिळत असल्याचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या.

‘हिंद दी चादर’ म्हणून ओळखले जाणारे गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त हा समूहगान उपक्रम कणकवली येथील विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला येथे घेण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, धर्मनिरपेक्षता आणि मानवतेच्या मूल्यांची जपणूक करण्याची प्रेरणा निर्माण झाली.
या प्रसंगी तहसिलदार दिक्षांत देशपांडे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, शिक्षणाधिकारी कविता शिंपी, मुख्याधिकारी गौरी पाटील, तसेच मुख्याध्यापक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सहभागाचे कौतुक करून अशा उपक्रमांमुळे इतिहासातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांची माहिती नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचते, असे मत व्यक्त केले.
पुढे बोलतांना जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे म्हणाल्या की, ‘हिंद दी चादर’ म्हणून ओळखले जाणारे गुरु तेग बहादूर हे शीख धर्मातील नववे गुरु होते. त्यांच्या जीवनकार्याने धर्मस्वातंत्र्य, मानवता आणि त्याग यांचे सर्वोच्च उदाहरण घालून दिले. प्रत्येकाला आपल्या श्रद्धेनुसार धर्म आचरण करण्याचा अधिकार आहे, ही त्यांची ठाम भूमिका होती. स्वतःच्या स्वार्थापेक्षा समाजहित मोठे मानावे. गरजूंना मदत करणे, दु:खींचे दुःख दूर करणे ही खरी ईश्वरभक्ती आहे. जात, पंथ, भाषा या पलीकडे सर्व मानव एकसमान आहेत. परस्परांप्रती आदर, करुणा आणि सहिष्णुता राखणे आवश्यक आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा. गुरु तेग बहादूर यांच्या शिकवणीमधून आपल्याला धैर्य, सहिष्णुता आणि मानवतेचा मार्ग मिळतो. त्यांचे जीवन हे धर्मस्वातंत्र्य आणि मानवी हक्कांसाठीच्या बलिदानाचे तेजस्वी प्रतीक आहे असेही त्या म्हणाल्या.

जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजित या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत सामूहिकरित्या प्रेरणादायी गीत सादर केले. सुप्रसिद्ध गायक सतिंदर सरताज यांनी गुरु तेग बहादूर यांच्या जीवनकार्यावर आधारित सादर केलेले गीत समूहगानातून गायले गेले. या गीताच्या माध्यमातून गुरुंच्या त्याग, शौर्य, धर्मस्वातंत्र्य व मानवतेच्या मूल्यांची जाणीव उपस्थितांना करून देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!