*कोंकण एक्सप्रेस*
*आजचा समाज सुशिक्षित, पण सुसंस्कृत नाही – प्राचार्य गोस्वामी*
*वेंगुर्ला प्रतिनिधी- प्रथमेश गुरव*
बॅ.खर्डेकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या साहित्यातून हेच जाणवते की, आजचा समाज हा सुशिक्षित आहे. परंतु, सुसंस्कृत झालेला नाही. त्यांच्या कार्याला समजून घेऊन समाजकार्य, समाजऋण व देशसेवा या गोष्टींची जोपासना आजच्या नव्या पिढीच्या तरूणाईमध्ये होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.डी.बी.गोस्वामी यांनी केले.
वेंगुर्ला येथील बॅ.खर्डेकर महाविद्यालयातील ग्रंथालय, कनिष्ठ व वरिष्ठ सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बॅ.खर्डेकर जयंती व लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती तसेच लोकमान्य बाळ गंगाधार टिळक यांची पुण्यतिथी असा एकत्रित कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी गटशिक्षणाधिकारी वासुदेव नाईक, प्राचार्य डॉ.डी.बी.गोस्वामी, महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी बापू गिरप, डॉ.एस.एस.भिसे, संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण, पर्यवेक्षक प्रा.डी.जे.शितोळे, प्रा.पी.जी.देसाई आदी उपस्थित होते.
डॉ.एस.एस.भिसे यांनी बॅ.खर्डेकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावर प्रकाशझोत टाकताना त्यांनी समाजाप्रती केलेल्या अतुलनिय योगदानाची माहिती दिली. विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. माजी विद्यार्थी बापू गिरप यांनी बॅ.खर्डेकर यांच्या काळातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. सूत्रसंचालन प्रा.आर.के.हराळे यांनी केले. तर आभार प्रा.पी.जी.देसाई यांनी मानले.
