*कोकण Express*
*कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईकांना वाढदिवसानिमित्त मनसेकडून शुभेच्छाच.. मात्र तलवारीने केक कापून नेमकं काय सिद्ध करायचं आहे..मनसेचा सवाल..?*
*वाढदिवसोत्सवानिमित अशाप्रकारे सार्वजनिक कार्यक्रमात तलवारीने केक कापण्यामागची भूमिका जनतेसमोर स्पष्ट करा…*
*मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांचे शिवसेनेला आवाहन*
काल दिनांक 26 मार्च 2019 रोजी कुडाळ मालवण चे विद्यमान आमदार मा.वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ येथे सार्वजनिक कार्यक्रमाचं आयोजन व नियोजन पक्षाच्या वतीने करण्यात आले होते. प्रथमत: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आमदार नाईकांना वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छाच…मात्र अशाप्रकारे एका सार्वजनिक कार्यक्रमात तलवारीने केक कापून आमदार महोदयांना जिल्ह्यात नेमका कोणता संदेश द्यावयाचा आहे, यामागची शिवसेनेची नेमकी भूमिका उघड होणे गरजेचे आहे. बॅ.नाथ पै,दंडवते असा राजकीय वारसा असलेल्या आपल्या जिल्हयात चक्क लोकप्रतिनिधीकडून असं कृत्य होणं ही खेदाची बाब आहे. वास्तविक आजपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी माजी मुख्यमंत्री मा.नारायण राणे व त्यांच्या समर्थकांवर दहशतवाद व जिल्ह्यातील शांतता भंग करण्याचे आरोप केले होते; आज त्याच शिवसेना पक्षाचे लोकप्रतिनिधी जिल्ह्यात मनाई आदेश व कलम 37 लागू असताना एका सार्वजनिक कार्यक्रमात तलवारीने केक कापून वाढदिवस आनंदोत्सव साजरा करतात ही बाब जिल्ह्याच्या प्रतिमेला नक्कीच भूषणावह नाही. शिवाय सत्तेत आल्यानंतर दहशतवादाबाबत शिवसेनेची भूमिका बदलली आहे का असा सवाल आता जनतेमधून उपस्थित होत आहे.’तलवारीने केक कापण्यामागची’ नेमकी भूमिका शिवसेनेने जनतेसमोर उघड करावी असे आवाहन मनसेच्या वतीने करण्यात येत आहे.