*कोकण Express*
*सरिता पवार, कमलेश गोसावी, सुरेश कुराडे यांचा साहित्यरत्न पुरस्काराने सन्मान*
*सरिता पवार, कमलेश गोसावी, सुरेश कुराडे यांचा साहित्यरत्न पुरस्काराने सन्मान*
*रत्नागिरी येथे प्राचार्य मारुती कांबळे यांच्या हस्ते गौरव*
*कणकवली ः प्रतिनिधी*
महाराष्ट्र रत्नसिंधू साहित्य कलामंच कोकण विभाग संस्थेच्यावतीने देण्यात येणारा साहित्यरत्न पुरस्कार कणकवलीतील कवयित्री सरिता पवार, कवी कमलेश गोसावी आणि असरोडी येथील कवी प्राचार्य सुरेश कुराडे यांना प्राप्त झाला असून रत्नागिरी येथील माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या सभागृहात झालेल्या पुरस्कार सोहळ्यात प्राचार्य मारुती कांबळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते काका जोशी, युयुत्सु आर्ते यांच्या हस्ते सदर पुरस्काराने या तिन्ही साहित्यिकांना गौरविण्यात आले.
पवार या कविता, ललित आणि कथा आदी साहित्यप्रकारात लेखन करत असून त्यांना यापूर्वी विविध पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.त्यांचे साहित्य महाराष्ट्रातील अनेक नामवंत नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध होत असून सिंधुदुर्ग जिल्हा समाज साहित्य संघटनेच्या त्या सचिव म्हणून साहित्य क्षेत्रात कार्यरत आहेत. तर कमलेश गोसावी हे गेली वीस वर्ष कविता लेखन करत असून त्यांची विविध साहित्यिक पुस्तके प्रसिद्ध झाली आहे प्राचार्य कुराडे हे गेली तीस वर्षे कविता लेखन करत असून ते एक परिवर्तन चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्ते म्हणूनही ओळखले जातात. असरोंडी जुनियर कॉलेजचे ते विद्यमान प्राचार्य म्हणून काम पाहत आहेत. या त्यांच्या कामाची दखल घेऊन या प्रस्तावा शिवाय सदर पुरस्काराने पवार, गोसावी आणि कुराडे यांना गौरविण्यात आले आहे.
यावेळी देवरुख येथील सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते यांना महात्मा जोतिबा फुले स्मृती समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुनील जाधव,नामवंत कवी समीक्षक प्रा डॉ बाळासाहेब लबडे,माध्यमिक शिक्षक पतपेढी संचालिका शोभा तांबे, अनंत जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी झालेल्या कवी संमेलनात सरिता पवार, सुरेश कुराडे,कमलेश गोसावी यांच्याबरोबरच जनार्दन मोहिते, प्रथमेश जाधव श्रीकांत राणे मनोज जाधव, संदीप सावंत, संजय तांबे, संदेश सावंत, संपत पाटील यांनी आपल्या आशयघन कविता सादर करून कविसंमेलनात रंगत आणली. पुरस्कार वितरण सोहळ्याचे सूत्रसंचालन संदेश सावंत यांनी तर कवी संमेलनाचे सूत्रसंचालन गौरी सावंत यांनी केले. आभार जनार्दन मोहिते यांनी मानले.