*कोंकण एक्सप्रेस*
*जीवन सोपे करून सांगणारे शब्द म्हणजे काव्य – शशिकांत तिरोडकर*
*फोंडाघाट प्रतिनिधी : गणेश इस्वलकर *
येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट मध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या एका पुष्पात साहित्यिक आपल्या दारी या उपक्रमात कवी शशिकांत तिरोडकर उपस्थित होते. आपल्या मनोगतात त्यानी काव्याविष्कार आणि जीवनानुभव उलगडून सांगितला. ते म्हणाले की जीवन सोपे करून सांगणारे शब्द म्हणजे काव्य. मी आस्वादक कवी आहे. मला काव्याचा आस्वाद घ्यायला आवडतो. काव्याचा आस्वाद घेता घेता काव्य माझ्याकडून घडत गेले. मी तसं सामान्य व्यक्तिमत्त्वाचा माणूस आहे पण काहीतरी चांगल करावं म्हणून कार्यरत असतो. विद्यार्थ्यांनी त्याच पद्धतीने घडले पाहिजे. आपण गरुडासारखे भरारी घेणारे माणस आहोत. आपल्या कर्तुत्वावर विश्वास ठेवला पाहिजे. या वयातच आपल्याला काव्यसपुरायला हवे असे मला वाटते.कारण याच वयात आपल्याला जीवन कळायला लागतं. माणसं समजायला लागतात. समाज अवगत व्हायला लागतो. अनेक अनुभवातून आपण शब्द गुंफायला लागतो आणि त्याचे काव्य बनत जाते. जीवनानुभव गुंफलेले काव्य जीवनानुभूती देते. एखाद्या सौंदर्याकडे पण आपण सकारात्मक दृष्टीने पाहतो. या वयात क्रांतिकारी विचार रुजायला लागतात. एखादा का या क्रांतिकारी विचारांनी जीवनाची घडी नीट बसली की जीवन सुंदर बनते. असे प्रतिपादन केले. त्यानंतर शशिकांत तिरोडकर यांनी काही कवितेचे वाचन व गायन केले आणि रसिकांना मंत्रमुग्ध करून सोडले.
आपल्या प्रास्ताविकामध्ये डॉ. सतीश कामत म्हणाले की काव्य हे जीवनाचे ठाव घेते. भोवतालच्या जगातील घटनांच्या नोंदी घेते. समाजाच्या व्यंगावर टीका करते. संघर्षाला वाचा फोडते. मनोरंजन करते. व्यक्तिमत्व उलगडून दाखवते आणि रसिक जमवते. खरं म्हणजे काव्य हे प्राचीन काळापासून समाज प्रबोधनाचे काम करत आहे. काव्याने विविध भावभावनांचा रंग उजळला आहे आणि म्हणूनच काव्य हे जीवन भाष्य असते असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. शशिकांत तिरोडकर यांची कविता याच धरतीवर वावरताना आपल्याला दिसते. असे प्रतिपादन केले.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. पुरंधर नारे म्हणाले की फोंडाघाट मध्ये अनेक साहित्यिक रत्न आहेत त्यातलं शशिकांत येरोडकर एक.ते काव्याचा आस्वाद देत असताना तरुण झाल्यासारखे वाटतात. सर्वोच्च पदावरून निवृत्त झाल्यानंतर काव्यात वावरायला सुरुवात केली आणि पुन्हा तारुण्य धारण केले. त्यांच्या माध्यमातून भविष्यातही अनेक कार्यक्रम आपल्याला घेता येतील. असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाच्या पूर्वी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भितीपत्रिकाचे अनावरण श्री. शशिकांत तिरोडकर यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जगदीश राणे यांनी तर आभार प्रा. संतोष जोईल यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचा सर्व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

