*कोंकण एक्सप्रेस*
*स्वच्छ सुंदर वेंगुर्ला शहराला खड्याचे ग्रहण- अॅड. मनीष सातार्डेकर*
*वेंगुर्ला : प्रतिनिधी*
वेंगुर्ला शहर हे स्वच्छ व सुंदर शहर म्हणून ओळखले जाते. व या शहराला राज्य व देश पातळीवर स्वच्छतेबाबत अनेक पुरस्कार देखील मिळालेले आहेत. असे असले तरी शहरातील रस्त्यावर पडलेल्या खड्यामुळे स्वच्छ व सुंदर शहराला खड्याचे ग्रहण लागले असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अॅड. मनीष सातार्डेकर यानी केला आहे.
वेंगुर्ला शहरात भुमिगत विजवाहिनी घालणे तसेच गॅस पाईप लाईन घालणे यासाठी शहरातील सर्वच रस्ते खोदण्यात आलेले होते. परंतु सदर रस्त्याची डागडूजी संबंधित ठेकेदारांनी योग्यरित्या केलेली नाही. तसेच संबधित ठेकेदाराने आपल्या मनमानी प्रमाणे रस्त्यांची खोदाई केलेली असून सदर खोदाईचे काम करताना ठेकेदाराने रस्त्याच्या मधोमध चर खोदलेले होते. व ते चर योग्यरित्या न भरल्याने सदर ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडलेले असुन त्याचा प्रचंड त्रास वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना देखील होत आहे. संबंधीत प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप देखील अॅड. सातार्डेकर यांनी केला आहे.
सदरचे ठेकेदार रस्ताखोदाईचे काम करत असताना त्या ठिकाणी संबंधीत प्रशासनाचा कोणताही अधिकारी वा कर्मचारी उपस्थित नसल्याने ठेकेदाराने आपल्या मनमानी प्रमाणे खोदाईचे काम केलेले आहे. व सदर रस्त्यावर चर योग्यरित्या बुजवलेले नाहीत व शहरातील रस्त्याची योग्यरित्या डागडूजी केलेली नाही.परंतु असे असून देखील प्रशासन संबंधित ठेकेदारावर कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर नगरपरिषद एवढी मेहरबान का आहे असा प्रश्न देखील सर्वसामान्य जनतेच्या मनात येत आहे.
याचे कारण वेंगुर्ला शहर हे स्वच्छ व सुंदर शहर म्हणून ओळखले जाते.परंतु या खड्यामुळे शहरात येणाऱ्या पर्यटकांना या खड्याचा प्रंचड त्रास होतो. व त्याच्या मनात वेंगुर्ला शहराबाबत असलेली चांगली प्रतिमा मलीन होण्याचे काम या खड्यामुळे होत आहे व हे खड्डे म्हणजे वेंगुर्ला शहराला लागलेले ग्रहण असून सदर खड्यामुळे शहराच्या सौंदर्यांला डाग लागत आहे.त्यामुळे संबंधित प्रशासनाने याची गंभीर दखल घेवून सदरचे खड्डे त्वरित बुजवावेत व संबंधित ठेकेदारांवर योग्यती कडक कायदेशीर कारवाई करावी.अन्यथा यांचे गंभीर परिणाम संबंधित प्रशासनाला भविष्यात भोगावे लागतील. असा इशारा देखील सामाजिक कार्यकर्ते अॅड. मनीष सातार्डेकर यांनी दिला आहे.