*कोकण Express*
*मातृभाषेतून घेतलेले शिक्षण जास्त परिणामकारक आणि दीर्घकाळ टिकणारे असते ; प्रभाकर कुडतरकर*
*कासार्डे माध्यमिक विद्यालयात मराठी राज्यभाषा दिन विविध कार्यक्रमाने साजरा झाला*
*कासार्डे ; संजय भोसले*
व्यक्तीला त्याच्या स्वतःच्या भाषेत सांगितलेली कोणतीही संकल्पना अगदी सहजरीत्या प्राप्त होते. कारण त्यांची कल्पनाशक्ती आपल्या भाषेतच जास्त चालते. म्हणून मातृभाषेतून घेतलेले शिक्षण जास्त परिणामकारक, आणि दीर्घकाळ टिकणारे असते. आज मराठी राज्यभाषा दिन साजरा करत असताना मराठी भाषा इतकी समृद्ध का झाली ? हे समजून घेणे गरजेचे आहे. आपले साहित्यिक, संत , थोर विचारवंत इत्यादिनी ही भाषा समृद्ध करण्यासाठी, तिचा व्यवहारामध्ये फक्त वापरच केला नाही तर खऱ्या अर्थाने त्या महान विभूतीनी मराठी भाषा जगले होते. म्हणूनच आज मराठीला राज्यभाषाचा दर्जा प्राप्त झाला आहे. सध्या इंग्लीश मेडीयम स्कूल, आणि सेमीचे प्रस्थ वाढताना आपण पाहतो पण तेथे सामाजिक दर्जा टिकवण्यासाठी धडपड सुरू असते. उलट मराठी भाषेला कुठेही अडसर निर्माण झाला नाही. मात्र ती तेवढ्याच डौलाने आज आपलं अस्तित्व टिकवून आहे. असे प्रतिपादन कासार्डे विकास मंडळाचे पदाधिकारी प्रभाकर कुडतरकर यांनी केले. ते कासार्डे विद्यालयात मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावरून बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर कासार्डे विकास मंडळाचे पदाधिकारी संजय पताडे, कासार्डे माध्यमिक व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य मधुकर खाडे, पर्यवेक्षक नारायण कुचेकर, कासार्डे सीनियर कॉलेजचे प्राचार्य सिद्धेश डिगसकर ,कासार्डे विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्यामसुंदर राणे, श्रीमती रजनी कासार्डेकर, मराठी विभाग प्रमुख श्रीमती भाग्यश्री बिसूरे ,ज्येष्ठ शिक्षक अवधूत घुले, पांडुरंग काळे, आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्याचबरोबर *जय जय महाराष्ट्र माझा* या विद्यार्थ्यांनी गायलेल्या सुरेल गीतांनी उपस्थित यांचे स्वागत करण्यात आले. तर यावेळी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी *जन्मभूमी ,कर्मभूमी ,ही माय मराठी आमची* या गीतावर अप्रतिम असा नृत्याविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त प्रशालेत रांगोळी स्पर्धा, भिंती पत्रक स्पर्धा, काव्य गायन स्पर्धा, व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या सर्व स्पर्धांना विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. तर यामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी बहुसंख्य विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मराठी भाषा कशी समृद्ध झाली? आणि तिचे जतन करणे का गरजेचे आहे? त्याची माहिती दिली.
यावेळी संस्था पदाधिकारी संजय पाताडे म्हणाले की आपण आपल्या जीवनात मराठीचा वापर जास्तीत जास्त करावा. हे करत असताना भविष्यात देखील स्वतःची सही ही मराठीतच करण्याचा संकल्प करावा म्हणजे खऱ्या अर्थाने आपण मराठी जगत आहोत असे आपल्याला वाटेल. त्याचबरोबर प्रशालेचे प्राचार्य मधुकर खाडे, ज्येष्ठ शिक्षक अवधुत घुले , पांडुरंग काळे,नारायण कुचेकर श्रीमती बिसुरे ,श्रीमती डंबे, श्रीमती कासार्डेकर .आदींनी आपले मनोगत व्यक्त केले .संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. व्ही. राऊळ यांनी केले ,प्रास्ताविक श्रीमती डंबे यांनी मांडले, तर श्रीमती नागावकर यांनी केलेल्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.