गवत गंजीला आग लावल्याचा आरोपातून दोघे निर्दोष

गवत गंजीला आग लावल्याचा आरोपातून दोघे निर्दोष

*कोकण  Express*

*गवत गंजीला आग लावल्याचा आरोपातून दोघे निर्दोष…*

*कणकवली ः प्रतिनिधी*

शिवडाव ओटोसवाडी येथील रमाकांत विश्राम केणी यांच्या घर परिसरातील गवताच्या गंजीला आग लावून नुकसान केल्याप्रकरणी तेथीलच सुरेश शंकर केणी, शिवराम शंकर केणी यांची येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती डी. के. पाटील यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपींच्यावतीने अॅड. उमेश सावंत यांनी काम पाहिले. दि. २७ मे २०१६ च्या पहाटे ४ वा.च्या सुमारास फिर्यादी रमाकांत केणी यांच्या घर परिसरातील असलेल्या गवताच्या गंजीतून धूर येताना दिसल्याने त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता त्या आगीच्या उजेडात त्यांचे भाऊबंद सुरेश शंकर केणी व शिवराम शंकर केणी यांच्यासह शेजारी सत्यवान नारायण सदडेकर हे उभे असलेले दिसले.

फिर्यादीने त्यांच्यावर बॅटरीचा प्रकाश टाकला असता ते पळून गेले. या प्रकारानंतर घटनेची माहिती देण्यासाठी फिर्यादी आपला मुलगा मंगेश रमाकांत केणी याच्यासह पोलीस पाटील चंद्रमणी तांबे यांच्याकडे जात असताना वरील तीनही आरोपींनी त्यांना रस्त्यात अडवून गवताची गंजी आम्हीच जाळली आहे, पोलीस स्टेशनला तक्रार दिली तर ठार मारू अशी धमकी दिली. त्यानंतर फिर्यादीने कणकवली पोलिसांशी १०० नंबरवरून संपर्क साधला. त्यानंतर आरोपींवर भादंवि कलम ४३५, ३४१, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा घडल्यापासून सत्यवान सदडेकर हे फरारी असल्याने त्यांच्याविरूद्धचा गुन्हा कायम ठेऊन अन्य आरोपीविरूद्ध खटला चालला. यात एकूण चार साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी व आरोपी यांच्यात सामाईक जमिनीवरून असलेले वैमनस्य, घटनास्थळाबाबत निर्माण झालेली साशंकता, आरोपी शिवराम केणी हे घटनेच्यावेळी ओरोस बुद्रुक येथे जि.प.मध्ये सरकारी कर्मचारी म्हणून नोकरीस असल्याचे स्पष्ट झाले. तसेच फिर्याद देण्यास झालेला विलंब, साक्षीदारांच्या साक्षीतील तफावती, शास्त्रीय पुरावा नसल्याने आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!