*कोकण Express*
*माध्यमिक शिक्षक भारतीचे नवव्या दिवशी आंदोलन मागे*
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना कोविड ड्युटी तून मुक्त करून शाळा सुरू करण्यास परवानगी द्यावी या मागणीसाठी शिक्षक भारतीने २३ ऑगस्ट पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु केलेले उपोषण आजच्या नव्या दिवशी जिल्हाधिकारी यांच्या विनंतीनुसार व शिक्षण विभागाच्या पत्रानुसार सोडले . शिक्षक भारती संघटनेच्या वतीने आपल्या मागणीसाठी १५ ऑगस्ट रोजी लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांना निवेदन देण्यात आले मात्र याबाबत योग्य तो निर्णय घेतला नसल्याने शिक्षक भारतीच्या वतीने पुन्हा २३ ऑगस्टपासून उपोषण सुरू केले होते.आजच्या उपोषणाच्या ९ व्या दिवशी जिल्हाधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांच्या विनंतीनुसार आणि शिक्षण विभागाच्या पत्रानुसार आज उपोषण सोडले असल्याची माहिती अध्यक्ष संजय वेतुरेकर यांनी दिली. येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे उपोषण सुरू केले होते. यामध्ये हेमंत सावंत, संजय खोचरे, नितीन गावकर, आकाश पारकर आदी सहभागी झाले होते . जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी झाला आहे.सर्व निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. बाजारपेठ खुल्या झाल्या आहेत.असे असताना अजुन शाळा सुरु करण्याबाबत प्रशासन निर्णय का घेत नाही.खाजगी शिकवण्या घेतल्या जात आहेत.मग शाळा सुरु करून मुलांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न का होत नाहीत. नाहक कोरोना ड्युटी साठी शिक्षकांना वेठीस धरले जात आहे. हे थांबवून तात्काळ शिक्षकांना कोविड -१९ ड्यूटीतून मुक्त करा. व शाळा नियमित सुरू करा. अशी मागणी शिक्षक भारती संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली होती. याबाबत आज जिल्हाधिकारी के मंजू लक्ष्मी यांच्याशी झालेल्या चर्चेत सध्या गणेशोत्सव जवळ आला आहे .जिल्ह्यात चाकरमानी दाखल होणार आहेत. त्यामुळे कोरोना प्रादूर्भाव वाढण्याची शक्यताआहे.या सर्व परिस्थितीचा अंदाज घेऊन शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येतील. दहावी व बारावी चे वर्ग सुरू करण्याबाबत परवानगी देण्यात आली आहे. इतर वर्गही गणेशोत्सवानंतर कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येतील. त्यामुळे प्रशासनाला गणेशोत्सवापर्यन्त सहकार्य करा. असे सांगितले. तसेच शिक्षण विभागाने आमच्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार केला जाईल. असे स्पष्ट केल्याने त्यांच्या विनंतीला मान देऊन आज उपोषण थांबविण्यात आले यावेळी माध्यमिक उप शिक्षणाधिकारी मदृपकर यांनी लिम्बुसरबत देऊन सुरु असलेले साखळी उपोषण सोडवले. असल्याची माहिती संजय वेतोरेकर यांनी दिली.