*कोंकण एक्सप्रेस*
*कस्तुराबाई सोमा गवस यांचा इशारा : पिकुळेतील वीजेचा लपंडाव थांबवा. “बिल वेळेवर भरतो, मग अंधाराची शिक्षा कशासाठी..?*
*दोडामार्ग : गवस शुभम*
पिकुळे परिसरात गेल्या काही दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दिवस असो वा रात्र, सतत सुरू असलेल्या वीजेच्या लपंडावामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून विद्यार्थ्यांसह शेतकरी, व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
सध्या पावसाळी व वादळी वातावरणामुळे वीजवाहिन्यांवर झाडे व फांद्या पडण्याच्या घटना वाढल्या आहेत. यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना कस्तुराबाई सोमा गवस यांनी वीजवाहिन्यांना अडथळा ठरणारी झाडे व फांद्या तातडीने हटविण्याची मागणी केली आहे.
“ज्या ठिकाणी झाडांमुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका आहे, त्या ठिकाणची झाडे त्वरित कापण्यात यावीत. तसेच झाडे कापण्यास कोणी अडथळा आणत असेल तर संबंधितांवर प्रशासनाने कारवाई करावी,” अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी त्यांनी महावितरणच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “वीजबिल वेळेत भरले नाही तर ग्राहकांचा वीजपुरवठा तात्काळ खंडित केला जातो. मग नियमित बिल भरूनही नागरिकांना वारंवार अंधारात का राहावे लागते?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पिकुळे परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणने तातडीने उपाययोजना कराव्यात, झाडांच्या फांद्यांची छाटणी करावी आणि नागरिकांना अखंडित वीजसेवा द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

