*कोकण Express*
*’त्या मारहाण प्रकरणातील चौघांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले”*
*सिंधुदुर्गनगरी:*
दोडामार्गात भाजपच्या दोन गटात झालेल्या घमासान आणि त्यानंतर झालेली हाणामारी आणि याच हाणामारी प्रकरणी भाजपच्या एका गटातील सहा जणांवर दाखल असलेल्या ३०७ सह विविध गुन्हेप्रकरणी अखेर न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळून लावला आहे.
राजकीय वैमनस्यातून झालेल्या वादात जीवे मारहाण केल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोडामार्ग येथील त्या चौघांचा जामीन शनिवारी जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला. कोनाळचे सरपंच पराशर जगन्नाथ सावंत (रा कोनाळकट्टा), भाजपचे युवा नेते शैलेश सुरेश दळवी (रा.सुरुचीवाडी), पंचायत समिती सदस्य लक्ष्मण उर्फ बाळा सखाराम नाईक (रा.उसप) व भाजपचे तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण उर्फ प्रवीण तुळशीदास (रा.गवस-मणेरी) यांचा जामीन न्यायालयाने फेटाळला असल्याने हा त्यांच्यासाठी मोठा धक्का आहे. माजी उप नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्यावरही याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. मुळात चव्हाण यांच्या कार्यालयासमोर ज्यांनी जाणीवपूर्वक ही मारहाण करण्यास भाग पाडले ते मोकाट आहेत तर पोलिसांनी आपल्याला नाहक यात गुंतवल्याचा आरोप चव्हाण यांच्या समर्थकांतून होत आहे. किमान आपल्याला जामीन मिळून झालेला अन्याय दूर होईल या अपेक्षेवर असलेल्या साऱ्यांनाच न्यायालयाच्या निकालाने धक्का बसला आहे. याप्रकरणी सरकारी वकील रुपेश देसाई यांनी काम पाहिले. तर वादीच्या वतीने भरत प्रभु यांनी बाजू मांडली. मात्र फिर्यादी प्रवीण नाडकर्णी आणि रोहित नाडकर्णी यांच्या वर राजकीय वैमनस्यातून हल्ला झाला होता. त्यांना मारहाण करण्यात आली होती. हा प्रकार २ तारखेला घडला होता. याप्रकरणी दोडामार्ग पोलीस स्थानकात संबंधित संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात येणार असती मात्र संबंधितांनी अंतरिम अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयाकडे अर्ज दाखल केला होता. आज या अर्जावर सुनावणी घेण्यात आली. यावेळी जिल्हा न्यायालयाने चौघांचा ही अंतरिम अटकपूर्व जामीन फेटाळून लावला आहे. त्यामुळे आता चव्हाण व अन्य लोकांच्या जामीन बाबत न्यायालय काय निर्णय देते याकडे सुद्धा चव्हाण समर्थक यांचे लक्ष लागून आहे.

