*कोकण Express*
*“रामदास आठवलेंनी आंबेडकरी चळवळीशी केली गद्दारी…”*
*रतनभाऊ कदम यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रवेशाबाबत जाहीर खुलासा*
*सिंधुदुर्ग*
गेली तीस-पस्तीस वर्षे आंबेडकर चळवळ वाढवण्यासाठी रामदास आठवलेंसोबत आम्ही काम करत आलो. परंतु रामदास आठवलेंनी भाजपा आणि आर. एस एस. सारख्या जातीयवादी पक्षाबरोबर जाऊन आंबेडकर चळवळीशी गद्दारी केलीय. असे अजून काही नेते आहेत, जे आपल्या स्वार्थासाठी भाजप आणि आर. एस.एस. ला मागून समर्थन करत आहेत. अशा आंबेडकरी चळवळीला गालबोट लावणाऱ्या गद्दार नेत्यांची आम्हाला काहीही गरज नाही. त्यामुळे महाराष्ट्रात असं एकमेव नेतृत्व आहे, जे आंबेडकरी चळवळीला पुढे घेऊन जातील आणि आंबेडकरी जनतेला न्याय मिळवून देतील, ते म्हणजेच शरद पवार. त्यामुळे याच उद्देशाने आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे, असे म्हणत रतन कदम यांनी आरपीआयला रामराम ठोकण्याचं आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचं कारण स्पष्ट केले आहे.
आरपीआय जिल्हाध्यक्ष रतन कदम यांनी आरपीआयला रामराम ठोकून आम. शेखर निकम यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे आरपीआयला मोठा धक्काच बसला. परंतु आपल्या राष्ट्रवादी प्रवेशाचं कारण रतन कदम यांनी सांगून आठवलेंळरही हल्लाबोल केला आहे. शरद पवार हे एकच नेते असे आहेत, जे सर्व जाती-धर्माला समान न्याय देतात. ज्या ज्या वेळी आंबेडकरी जनतेवर वाईट प्रसंग आलेला आहे, त्या त्या वेळी शरद पवारांनीच जास्त प्रमाणात मदतीचा हात दिलेला आहे. त्यामुळे आज जर आपल्याला भाजपा आणि आर. एस एस. सारख्या जातीयवादी पक्षाला जर सत्तेपासून लांब करायचं असेल, तर शरद पवारांच्या मागे आंबेडकरी जनतेने खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे. त्याचीच सुरुवात आम्ही केली आहे. शरद पवार नक्कीच भाजपा सारख्या जातीयवादी पक्षाला आणि आर. एस. एस. सारख्या संघटनेला महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण भारतातून हद्दपार करतील, असा विश्वासही रतन कदम यांनी व्यक्त केला आहे.

