*कोकण Express*
*राणेंना मंत्रीपद हा महाराष्ट्राचा सन्मान ; अतुल काळसेकर*
*आत्मनिर्भर योजनेला गती मिळणार…!*
*कणकवली ः संंजना हळदिवे*
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार नारायण राणे यांच्यावर लघु, मध्यम उद्योग मंत्री पदाची जबाबदारी सोपवली आहे. हा केवळ सिंधुदुर्गच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राचा सन्मान आहे. तसेच राणेंना मंत्रिपद दिल्यामुळे सिंधुदुर्गाच्या विकासाला खर्या अर्थाने चालना मिळणार आहे, असे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे संचालक अतुल काळसेकर यांनी सांगितले.
सिंधुदुर्गचे सुपुत्र, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, आणि आमचे मार्गदर्शक नारायण राणे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश झाला. राणे हे आपल्या प्रदीर्घ राजकीय अनुभवातून चांगल्या प्रकारे देशाला, पर्यायाने उपक्रमशील उद्योजकांना न्याय देऊ शकतील. त्यांच्याकडे सोपवण्यात आलेल्या सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग प्रणालीत जिल्ह्यातील मत्स्य व्यवसाय, फळप्रक्रिया व्यवसाय, पर्यटन व्यवसाय, खादी ग्रामोद्योग व इतर लघु उद्योगांना आणि त्या अनुषंगाने व्यवसाय करु इच्छिणार्या नव उद्योजकांना या खात्याच्या माध्यमातून मोठ्या संधी उपलब्ध होईल. केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर अभियानाला गती प्राप्त होईल. राणे यांच्या या खात्याचे मंत्रीपद ही जिल्ह्यासाठी सुसंधी असल्याचे काळसेकर यांनी सांगितले. दरम्यान, दिल्ली येथे ना. नारायण राणे यांची अतुल काळसेकर यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी माजी आ.प्रमोद जठार, माजी आम. अजित गोगटे, संघटन सरचिटणीस प्रभाकर सावंत उपस्थित होते.
