*कोंकण एक्सप्रेस*
*उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी महावितरणचे पोलिसांना निवेदन…*
*दोडामार्ग, शुभम गवस*
दोडामार्ग तालुक्यातील महावितरणच्या कोनाळकट्टा ३३/११ केव्ही उपकेंद्रात घडलेल्या एका घटनेच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. यासंदर्भात महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दोडामार्ग पोलिस ठाण्याकडे निवेदन सादर करून योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १ जुलै रोजी पहाटे सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास काही व्यक्तींनी उपकेंद्र परिसरात प्रवेश करून ड्युटीवरील कर्मचाऱ्यांशी वाद घातल्याची घटना घडली. या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांनी आपल्या निवेदनातून भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात तसेच कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी योग्य संरक्षण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, या निवेदनाची दखल घेऊन संबंधित यंत्रणांकडून आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

