*कोंकण एक्सप्रेस*
*वेंगुर्लेत केंद्र सरकारच्या स्वनिधी योजनेअंतर्गत लोककल्याण मेळावा उत्साहात संपन्न*
*मोदी सरकारने सर्वसामान्य जनतेच्या जिवनात अमुलाग्र बदल घडवून आणला — नगराध्यक्ष राजन गिरप* .
*वेंगुर्ला ः प्रतिनिधी*
वेंगुर्ला नगरपरिषदेच्या वतीने केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत लोककल्याण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यास नगराध्यक्ष राजन गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर ,सभापती गौरी मराठे , भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई , उपसभापती रिया केळकर , अग्रणी बँक व्यवस्थापक ऋषिकेश गावडे , बँक ऑफ इंडिया अधिकारी रोहित सर , सहाय्यक प्रकल्प अधिकारी विलास ठुंबरे तसेच समुदाय संघटक अतुल अडसूळ उपस्थित होते. या कार्यक्रमास 30 लाभार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना नगराध्यक्ष राजन गिरप म्हणाले कि नरेंद्र भाई मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत येऊन नुकतीच १२ वर्षे पुर्ण झाली . या १२ वर्षात अनेक क्षेत्रात सामान्य माणसाच्या फायद्याचे , सामान्य माणसाचे दैनंदिन जिवन सुखकर करणारे अनेक निर्णय झाले . केंद्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा नागरिकांनी अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन केले. पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांनी तिन्ही टप्प्यांतील कर्जाचा लाभ घेऊन आपले व्यवसाय अधिक सक्षम करावेत, असे त्यांनी सांगितले. तसेच बँक स्तरावर कोणत्याही प्रकारच्या अडचणी अथवा समस्या निर्माण झाल्यास नगरपरिषदेशी संपर्क साधावा, असेही त्यांनी नमूद केले. जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी कर्ज घेऊन आपले उद्योग-व्यवसाय उभे करावेत व आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी अग्रणी बँक व्यवस्थापक ऋषिकेश गावडे यांनी बँकांच्या विविध योजना, कर्ज प्रक्रिया तसेच लाभार्थ्यांसाठी उपलब्ध सुविधांविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच बँक स्तरावर प्रलंबित असलेली प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.
मेळाव्यात पीएम स्वनिधी योजनेतील पात्र लाभार्थ्यांना क्यूआर कोडचे वाटप करण्यात आले. तसेच नव्याने कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारण्यात आले. उपस्थित लाभार्थ्यांनी योजनेविषयी माहिती जाणून घेत मोदी सरकारचे आभार मानले .

