*कोंकण एक्सप्रेस*
*कणकवलीत अवकाळी व हवामान बदलाचा आंबा-काजूला मोठा फटका; नुकसान भरपाईसाठी शिवसेनेचे तहसीलदारांना साकडे*
*कणकवली ः संजना हळदिवे*
गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या वातावरणातील बदलामुळे आणि प्रतिकूल हवामानामुळे कणकवली तालुक्यातील आंबा व काजू बागायतदारांचे कंबरडे मोडले आहे. या संकटाची दखल घेत, शासनाने तातडीने पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करत शिवसेनेच्या वतीने तहसीलदार कार्यालयात निवेदन देण्यात आले.
बागायतदार संकटात
यावर्षी सुरुवातीला आंबा आणि काजूला चांगला मोहोर आल्याने बागायतदारांमध्ये आशेचे वातावरण होते. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि सातत्याने बदलणाऱ्या हवामानामुळे हा मोहोर करपून गेला असून फळधारणेवर मोठा परिणाम झाला आहे. कणकवली तालुक्यात काजू हे मुख्य उदरनिर्वाहाचे साधन आहे, मात्र उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
निवेदनातील प्रमुख मागण्या:
महसूल आणि कृषी विभागाने तातडीने बागांमधील नुकसानीची संयुक्त पाहणी करावी.
नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत.
शासन दरबारी पाठपुरावा करून बागायतदारांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून द्यावी.
प्रमुख उपस्थिती
हे निवेदन देताना शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी शिवसेना फोंडाघाट विभाग प्रमुख सिद्धेश राणे, तालुका संघटक राजू राठोड, खारेपाटण विभागप्रमुख बाळा राऊत, हरकुळ विभागप्रमुख अविनाश सावंत यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
बागायतदारांच्या या मागणीवर प्रशासन काय पावले उचलते, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

