आता पीसीएम, पीसीबी आणि एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, मंत्री चंद्रकांत पाटील यांची मान्यता

आता पीसीएम, पीसीबी आणि एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, मंत्री चंद्रकांत पाटील यांची मान्यता

*कोंकण एक्सप्रेस*

*आता पीसीएम, पीसीबी आणि एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, मंत्री चंद्रकांत पाटील यांची मान्यता*

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून आगामी शैक्षणिक वर्षामध्ये दोनदा सीईटी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याला उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार पीसीएम, पीसीबी व एमबीए या परीक्षा वर्षांतून दोन वेळा होणार आहेत. पहिली प्रवेश परीक्षा एप्रिल-2026 मध्ये तर दुसरी प्रवेश परीक्षा मे 2026 महिन्यात होणार असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आज केली आहे.

महाराष्ट्रातील मुलांनाही दोन प्रवेश परीक्षेमधून मिळणार दोन संधी

आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सीईटी परीक्षा संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय स्तरावर जेईईच्या दोन प्रवेश परीक्षा होतात, त्यामुळे विद्यार्थ्यांना दोनदा संधी उपलब्ध होते. तशाच दोन संधी महाराष्ट्रातील मुलांनाही या दोन प्रवेश परीक्षेमधून मिळणार आहेत. विद्यार्थ्याला एक प्रवेश परीक्षा देणे बंधनकारक असून दुसरी प्रवेश परीक्षा ऐच्छिक असणार आहे. जर विद्यार्थ्याने दोन प्रवेश परीक्षा दिल्यास तर त्याला दोन्हीपैकी ज्यामध्ये जास्त गुण असतील ते प्रवेशासाठी गृहीत धरले जातील.

या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक सीईटी कक्ष लवकरच जाहीर करणार
येणाऱ्या वर्षी पीसीएम, पीसीबी व एमबीए या तीन अभ्यासक्रमाच्या पहिली प्रवेश परीक्षा एप्रिल 2026 मध्ये घेण्यात येईल. तर दुसरी प्रवेश परीक्षा मे 2026 महिन्यात होणार आहे. या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक सीईटी कक्ष लवकरच जाहीर करणार आहे.

नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

आज माझ्या अध्यक्षतेखाली सीईटी परीक्षा संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. यामध्ये राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून पीसीएम, पीसीबी आणि एमबीए या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा (सीईटी) वर्षातून दोन वेळा घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

विद्यार्थ्यांना पहिली परीक्षा देणे बंधनकारक असून दुसरी परीक्षा ऐच्छिक असेल. दोन्ही परीक्षा दिल्यास, विद्यार्थ्याच्या जास्त गुणांची परीक्षा प्रवेशासाठी ग्राह्य धरली जाईल. या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, सीईटी कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे, उपसचिव प्रताप लुबाळ संबधित अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!