*कोंकण एक्सप्रेस*
*कास्ट्रॉइब शिक्षक संघटना सिंधुदुर्ग चे २५ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन*
*शिरगाव : संतोष साळसकर*
राज्य सरकारने प्राथमिक शाळांतील मुलांच्या पटसंख्येचा विचार करून शिक्षक संच मान्यता निश्चित केली आहे. ही संचमान्यता अन्यायकारक असल्याने राज्यभर शिक्षक संवर्गाचे आक्रंदन सुरू झाले आहे. याची तीव्रता कोकण विभागातील डोंगराळ दुर्गम समजल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांना मोठा फटका बसणार आहे. यातूनच मुलांचे शैक्षणिक नुकसान होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. शासनाच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी कास्ट्राईब शिक्षक संघटना सिंधुदुर्गने २५ मार्च २०२५ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी तीन वाजता आंदोलन पुकारले आहे. राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयाने शिक्षक संच मान्यतेच्या नावाखाली जवळपास प्रत्येक शाळेतील शिक्षक संख्या घटवण्याचा प्रयत्न केला आहे. शासनाच्या या निर्णयाने मराठी शाळा ओस पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक वर्षांच्या प्रयत्नातून महाराष्ट्राची मातृभाषा असलेल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे. ही भाषा खऱ्या अर्थाने मराठी शाळेत संवर्धित होते असे आमचे मत आहे. त्यामुळे शासनाच्या धोरणाने शिक्षकच कमी किंवा अतिरिक्त ठरणार असतील तर मराठी भाषा वाचवणे व मुलांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात येईल. शाळा शाळांतील पटसंख्या कमी झाली हे खरेच आहे पण अभ्यासक्रम, विषय कमी झालेला नाही. त्यामुळे शिक्षक संख्या घटवणे हा मुलांच्या शिक्षणाच्या मूलभूत हक्कांवर अन्याय करण्यासारखा आहे.
तसेच महाराष्ट्रातील शिक्षण सेवक पदही रद्द करण्यात यावे अशी मागणी याद्वारे करण्यात येत आहे. एकीकडे शैक्षणिक पात्रता व टिईटी सारखी कठीण परीक्षा देऊन शिक्षक भरती झालेली असताना कमी मानधनावर शिक्षण सेवक पद निर्माण झाल्याने शिक्षकांत आर्थिक दरी निर्माण झाली आहे. यासाठी समान काम समान वेतन राबविण्यात यावे. याच शिक्षक बांधवांना जुन्या पेंशन पासूनही वंचित राहावे लागणार आहे. नागरी सेवा नियमांप्रमाणे कर्मचाऱ्यांचे भवितव्य धोक्यात असल्याची जाणीव सुद्धा शासनाच्या धोरणाने कर्मचाऱ्यांत असंतोष पसरवित आहे. अशा सर्व प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी दि. २५ मार्च २०२५ रोजी दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास वाडीकर व सचिव मनोज आटक व उपाध्यक्ष विद्यानंद शिरगावकर तसेच संघटनेचे सर्व सदस्य यानी आंदोलन छेडण्याचे घोषित करून शासन निर्णयाला विरोध दर्शविणार आहेत. यावेळी कास्ट्राईब महासंघाचे अध्यक्ष संदिप कदम व महासचिव किशोर कदम तर विभागीय सचिव लक्ष्मण घोटकर हेही उपस्थित राहणार आहेत. शेकडो शिक्षक बांधवांनी यात सहभाग घेण्यासाठी आवाहनही केले आहे.