*कोंकण Express*
*समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधाचे अयोध्येत पारायण*
*वैभववाडी : प्रतिनिधी*
समर्थ रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधाचे पारायण दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशनतर्फे अयोध्येतील श्री. राघवजी मंदिर येथे मोठ्या थाटात आज सुरु झाले. या पारायणाची सांगता तेवीस नोव्हेंबर रोजी होईल.
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश व तेलंगणातील ११० समर्थभक्तांनी एकत्र येऊन अयोध्येत दासबोधाचे पारायण घेतले आहे. या पारायण काळात दासबोधाशिवाय समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक आणि आत्माराम ग्रंथांचेही पारायण होत आहे. दि.२१ ते २३ नोव्हेंबर या दरम्यान होणाऱ्या पारायण काळात श्री. रामलल्लांचे दर्शन, श्री हनुमानगढी दर्शन तसेच पवित्र शरयू नदीतील स्नानाचा लाभ सर्वांना होणार आहे. प.पू. अक्कास्वामी तथा आशालता वेलणकर यांनी चाळीस वर्षांपूर्वी दासबोध सखोल अभ्यास उपक्रम चालु केला, या दा.स.अ. फाउंडेशन तर्फे आयोजित दासबोध पायरायणकर्त्यांची निवास आणि भोजन व्यवस्था पुण्यातील सद्गुरु ट्रॅव्हल्सतर्फे करण्यात आली आहे.
अयोध्येत समर्थ संप्रदायाच्या प्रस्थानत्रयी ग्रंथांचे एवढ्यामोठ्या प्रमाणात होत असलेले हे पहिलेच पारायण असून दा.स.अ. फाऊंडेशन तर्फे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मा. आदित्यनाथ योगी यांना समर्थभक्तांना मार्गदर्शन करण्यासाठी पत्र पाठवून विनंती करण्यात आली असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

