*कोकण Express*
*राजकीय शक्तींच्या आक्रमणात कविता लिहिण्याची कसोटीच*
*अकराव्या उगवाई काव्योत्सवात कवी प्राचार्य काजरेकर यांचे प्रतिपादन*
*आवानओल प्रतिष्ठानतर्फे कणकवलीत आयोजन*
*कणकवली/प्रतिनिधी*
समाजात घडणार्या बर्या-वाईट घटनांचा त्रास सहन करून कविता लिहिणाऱ्या कवींची संख्या मोठी आहे. मात्र समाजातील व्यंगावर बोट ठेवून लिहिणाऱ्या कवींना संरक्षण पुरवावे लागते. आज राजकीय शक्तींच्या आक्रमणात कविता लिहिण्याची कवींच्या दृष्टीने कसोटीच आहे, ही वाईट घटना असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध कवी आणि समीक्षक प्राचार्य डॉ गोविंद काजरेकर यांनी येथे आयोजित करण्यात आले आवानओल प्रतिष्ठानच्या अकराव्या कविवर्य वसंत सावंत उगवाई काव्य उत्सवात केले.
आवानओल प्रतिष्ठान कणकवली आयोजित अकरावा कविवर्य वसंत सावंत उगवाई काव्योत्सव शहरातील आदर्श रेसिडेन्सी सभागृहात प्राचार्य काजरेकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला. यावेळी काजरेकर यांनी जात,धर्म आणि हिंसा यांचा आश्रय घेत राजकीय शक्ती आक्रमक होताना दिसतात.अशा काळात कवीची जबाबदारी मोठी आहे असेही आग्रहाने सांगितले.सामाजिक कार्यकर्ते डॉ सुभाष चंदन भंडारे यांनी वसंत सावंत यांची ‘अशा लाल मातीत जन्मास यावे’ ही कविता वाचून उद्घाटन केलेल्या या कार्यक्रमाला आवानओल प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय कांडर, कार्यवाह विनायक साबळे इतर पदाधिकारी ॲड. विलास परब, राजेश कदम, अच्युत देसाई, मोहन कुंभार,कल्पना मलये, किशोर कदम, सत्यवान साटम आदी उपस्थित होते.
प्राचार्य काजरेकर म्हणाले कवी हा समाजाचा आरसा असतो. समाजात जे चालते त्याचे परिणाम कवीवर होतात. संवेदनशील समाज निर्माण करण्यासाठी कवीचे योगदान महत्त्वाचं असतं.भाषिक सामर्थ्यामुळे कवी मोठा होतो. यासाठी अवतीभवतीची भाषा त्याला वापरता यायला हवी. बहिणाबाईंनी बोलीभाषेचा प्रभावी वापर कवितेत केला. चांगल्या कवितेचा कुठेही सन्मान होतो,त्याची दखल घेतली जातेच. म्हणूनच तुम्ही फक्त चांगल्या कविता लिहिण्याचा सतत प्रयत्न करत राहायला हवे. समकालीन कवी काळाकडे कसा बघतो हे महत्त्वाचे आहे. आजचा काळ हा काय आहे, तो आपल्यावर कोणत्या प्रकारे चाल करून येत आहे. याचं भान कवीला असायला हवं. शहर आणि गाव यांच्यात सीमारेषा अलीकडल्या काळात धूसर होत चालल्या आहेत. आजचा काळ अधिक गुंतागुंतीचा आणि आव्हानात्मक काळ आहे. नव्या पिढीचे संबंध सतत बदलत जात आहेत.आज आपण शतखंडित काळात जगत आहोत. हे जगणं कवितेत पकडणे फार कठीण आहे. म्हणून कविता लिहिताना कवीची कसोटी लागत असते. आजचा काळ राजकारणाच्या आक्रमकतेचा काळ आहे. राजकीय शक्ती आक्रमक होताना जात धर्म असा आश्रय घेतात. असे संवेदनशील माणसाच्या समोर आज पेच निर्माण होत आहेत. या सगळ्यापेचाची कविता आपल्याला लिहिता यायला हवी.
डॉ. भंडारे म्हणाले आवानओल प्रतिष्ठान गेली अनेक वर्ष चांगलं सांस्कृतिक काम करत आहे. सिंधुदुर्गातील साहित्यिक चळवळ पुढे नेण्यात या संस्थेचा प्रमुख भाग आहे.अतिशय गंभीरपणे या संस्थेचे कार्यक्रम होत असतात. म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणात रसिकांची उपस्थिती लाभत आहे. अशा मोठ्या संस्थेच्या कार्यक्रमाचे उद्घाटन मला करता आले याचा आनंद होत आहे.
कांडर म्हणाले आवानओल प्रतिष्ठानने गेल्या अकरा वर्षांत मराठीत कवितेत गुणवत्तापूर्ण कविता लेखन करणाऱ्या कवीना पुढे आणण्याचा सतत प्रयत्न केला. त्यामुळे या संस्थेतर्फे या कवींचा सन्मान करण्यात आला. ते कवी आजचे मराठीतील प्रमुख कवी म्हणून गणले जातात. साहित्य चळवळ राबवताना भाषेचे महत्वही लक्षात घ्यावं लागतं. मालवणी बोलीतील उगवाई शब्द वसंत सावंत यांनी मराठी कवितेला दिला. तो शब्द अधिक प्रमाण भाषेत रुजावा म्हणून उगवाई काव्योत्सव हे नाव या कार्यक्रमाला देण्यात आले आहे.यामागे कुठलीही धार्मिक भावना नाही. कवीला भाषिक सामर्थ्य काय आहे हे कळायला हवे. तरच तो चांगली कविता लिहू शकतो.सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले.ॲड. विलास परब यांनी आभार मानले.
यावेळी झालेल्या कविसंमेलनात सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, विद्रोही निसर्ग, प्रेम, अशा भावना व्यक्त करणाऱ्या विविध कविता जिल्हाभरातील कवींनी सादर केल्या.सभागृहात बसायलाही जागा नव्हती एवढा प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळाला.त्यात सावंतवाडी, देवगड, वैभववाडी, खारेपाटण, बांदा, शिरोडा, मालवण, वेंगुर्ले, कुडाळ अशा दूरदूरच्या भागातून कवी आणि कवितेचे रसिक उपस्थित होते.