*कोकण Express*
*कणकवलीतील स्टॉलधारक, विक्रेत्यांचे लवकरच पूनर्वसन*
*उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांची माहिती; सतीश सावंत यांनी आधी संचयनी ठेवीदारांना न्याय मिळवून द्यावा*
*कणकवली ः प्रतिनिधी*
चौपदरीकरणावेळी विस्थापित झालेल्या स्टॉलधारक, विक्रेत्यांची व्यवस्था आम्ही केली होती. त्याच धर्तीवर पुन्हा स्टॉलधारक आणि विक्रेत्यांचे पूनवर्सन आम्ही करू. त्याची काळजी सतीश सावंत यांनी करू नये. सावंतांना गरीबांची एवढीच तळमळ असेल तर आधी त्यांनी संचयनीमधील ठेवीदारांना न्याय मिळवून द्यावा असा प्रतिटोला कणकवली उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी लगावला.
कणकवली नगरपंचायत नगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
महामार्ग चौपदरीकरणात शहरातील विक्रेते, स्टॉलधारक विस्थापित झाले.चौपदरीकरणानंतर या सर्वांचे पुनवर्सन राणेंच्या माध्यमातून आम्ही केले. आता अचानक महामार्ग विभागाने स्टॉल हटाव मोहीम राबवली. यात विस्थापित झालेल्यांचेही पुनवर्सन आम्ही लवकरच करणार आहोत. त्यासाठी एक दोन जागांचीही निश्चिती केली आहे. हर्णे म्हणाले, ग्लोबल असोसिएटचे प्रथमेश तेली यांनी उभारलेल्या भाजी मार्केटमध्येही भाजी विक्रेत्यांचे पूनवर्सन करण्यास आमची हरकत नाही. मात्र कराराप्रमाणे विकासकाने या भाजी मार्केटपर्यंत जाण्यासाठी नऊ मिटरचा स्वतंत्र रस्ता करून देणे आवश्यक आहे. तसा करार विकास नगरपंचायत प्रशासनाबरोबर करत असेल तर तेथेही भाजी विक्रेत्यांचे पूनवर्सन होईल. तोपर्यंत आम्ही पर्यायी जागा शोधत आहोत.
बंडू हर्णे म्हणाले, सतीश सावंत जोपर्यंत राणेंसोबत होते, तोपर्यंतच त्यांना किंमत होती. राणेंची साथ सोडल्यानंतर एकेकाळी राजन तेली यांचे पीए असलेले विठ्ठल देसाई यांनी जिल्हा बँक निवडणुकीत सतीश सावंत यांचा पराभव करून, त्यांना त्यांची किंमत दाखवून दिली आहे. आता कणकवली विधानसभेचे गाजर मिळाल्याने ते राणेंवर टीका करत आहेत. मात्र त्यांनी आधी स्वत:चे आत्मपरीक्षण करून घ्यायला हवे. शहरातील विकास कामात राणे टक्केवारी घेत असल्याचाही आरोप सतीश सावंत यांनी केला. तसे असेल तर तुम्ही राणेंसोबत अनेक वर्षे होता. त्यांनी आणलेल्या निधीतून अनेक विकास कामे केली. त्यावेळी तुम्ही राणेंना किती टक्केवारी दिली हे जाहीर करा असे आव्हानही बंडू हर्णे यांनी दिली. तर स्टॉलधारकांबाबत कळवळा मांडणाऱ्या सतीश सावंत यांना संचयनी ठेवीदारांने अश्रू दिसले नाहीत का? सिंधुदुर्गातील अनेकांची आयुष्यभराची पूंजी संचयनीमध्ये अडकवली. त्यांच्या डोळ्यातील रक्त सावंत यांना दिसले नाही का? संचयनीमध्ये असूनही या ठेवीदारांना सतीश सावंत न्याय मिळवून देऊ शकलेले नाहीत. त्यामुळे स्टॉलधारकांबाबतही त्यांना कळवळा नाही. फक्त स्टॉल हटावचे निमित्त साधून ते राणे कुटुंबांवर टीका करण्याची हौस पूर्ण करत आहेत असे श्री.हर्णे म्हणाले.