*कोकण Express*
*रिफायनरी प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमधील दोन हजार गावातील तरूणांना रोजगार मिळणार…*
रिफायनरी विषय समजायला शिवसेनेला पाच वर्ष लागली ; प्रमोद जठार..*
रिफायनरी प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमधील दोन हजार गावातील तरूणांना रोजगार मिळणार आहे. तब्बल साडे तीनशे कोटींची उलाढाला प्रति महिन्याला होणार आहे. तर राज्यशासनाला निव्वळ ३० हजार कोटींचा जीएसटी महसूल वर्षाला मिळणार आहे. या सर्व बाबी समजायला शिवसेनला पाच वर्षे लागली अशी टीका भाजपचे प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी आज केली. तसेच संपूर्ण राज्यच असुरक्षित झाल्याने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट हाच पर्याय असल्याचेही ते म्हणाले.
येथील शासकीय विश्रामगृहात श्री.जठार यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले राजापूर नजीकच्या बारसू येथे रिफायनरी प्रकल्प होणार आहे. राज्याने त्याला परवानगी दिली. तर केंद्रीय पथकानेही नुकतीच या भागाची पाहणी केली. तीन टप्प्यात हा प्रकल्प होणार आहे. मात्र या प्रकल्पाचे फायदे समजायला शिवसेनेला पाच वर्षे लागली. आता या प्रकल्पाचे समर्थन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत करत आहेत. खरं तर पाच वर्षाआधीच शिवसेनेच्या मंडळींनी या प्रकल्पाचा अभ्यास केला असता, तर एवढ्यात रिफायनरी प्रकल्प कार्यान्वित झाला असता आणि तीन लाख कोटींची गुंतवणूक इथे झाली असती. हजारो बेरोजगारांना नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या असत्या.
श्री.जठार म्हणाले, जगातील श्रीमंत उद्योगपती अनिल अंबानी राज्यात सुरळीत नाही. आता तर खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचेही घर सुरक्षित राहिले नसल्याची बाब समोर आलीय. एकूणच राज्यातील जनताही असुरक्षित झाली आहे. सक्षम मुख्यमंत्री नसल्याने या बाबी होत आहेत. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लावणे हाच एकमेव पर्याय शिल्लक राहिला आहे.
ते म्हणाले, एस.टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण झाले असते तर राज्य शासनावर फक्त पाच हजार कोटींचा बोजा वाढला असता. मात्र राज्यातील कोट्यवधी जनतेला दिलासा मिळाला असता. खासगी वाहतूक दारांकडून होणारी लूट थांबली असती. पण राज्य सरकारला सर्वसामान्यांची काळजी नाही.


