*कोकण Express*
*छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान आणि सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान आयोजित रक्तदान शिबिर संपन्न*
*कणकवली ः प्रतिनिधी*
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. निसर्गनिर्मित आपल्या शरीरातील रक्तदान करून आपण कुणाचा तरी जीव वाचवतो ही भावनाच खूप पवित्र आहे. तरुणांनी स्वेच्छेने पुढे येऊन रक्तदान करावे, आपण केलेल्या रक्तदानामुळे ज्यांना हिमोग्लोबिन ,प्लेटलेट्स, प्लाझ्मा आवश्यक असतो त्यांची गरज पूर्ण होते. छत्रपती महाराज प्रतिष्ठान आणि सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठानचा हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असल्याचे प्रतिपादन कणकवली तहसीलदार रमेश पवार यांनी केले. कणकवली येथील छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान आणि सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरात 25 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत रक्तदान केले. याप्रसंगी तहसीलदार पवार बोलत होते. वरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित या रक्तदान शिबिरात दोन महिलांनीही रक्तदान केले. तहसीलदार रमेश पवार यांच्या हस्ते जिल्हा परिषद सदस्या स्वरूपा विखाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलन करून रक्तदान शिबिराचे उदघाटन करण्यात आले. यावेळी वरवडे प्राथ. आरोग्य केंद्राच्या डॉ.वळंजू, छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान चे अध्यक्ष धनंजय सावंत, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान चे अध्यक्ष अमेय मडव, शिवसेना कलमठ विभागप्रमुख अनुप वारंग, विजय कोदे, फ्रॅंकी लोबो, सुधीर सावंत, संदेश कडुलकर आदी उपस्थित होते. रक्तदात्यांना तहसीलदार पवार, जि.प.सदस्या विखाळे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.रक्तदान शिबिरासाठी सिव्हिल हॉस्पिटल ब्लड बँकेच्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी पथकाचे सहकार्य लाभले.