*कोकण Express*
*”रत्नागिरी – पाली”च्या वाऱ्या करणाऱ्यांनी पारकरांना निष्ठा शिकवू नये : रुपेश नार्वेकर*
*कणकवली ः प्रतिनिधी*
नारायण राणे यांच्यावर संदेश पारकर यांनी टीका केल्यानंतर कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांना मिरच्या झोंबल्या आहेत. निष्ठेची मुळी घेऊन ते संदेश पारकर यांना धडे देण्यासाठी सरसावले आहेत. नलावडे यांनी निष्ठेच्या गोष्टी करणे हा सर्वात मोठा विनोद आहे. पक्षांतराची धमकी देत नेत्यांना ब्लॅकमेल करणाऱ्या आणि “रत्नागिरी-पाली”च्या वाऱ्या करणाऱ्यानी “निष्ठा” हा शब्दसुद्धा उच्चारू नये, हे यानिमित्ताने मुद्दाम नमूद करावेसे वाटते.
माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते संदेश पारकर यांच्यामुळे राजकारणात आले आणि पदाधिकारी झाले. समीर नलावडे यांचा राजकीय उदय सुद्धा संदेश पारकर यांच्यामुळेच झाला, हे त्यांनी लक्षात ठेवावे. संदेश पारकर यांचा हात डोक्यावर नसता, तर नगरसेवक, बांधकाम सभापती आणि पंचायत समिती सदस्य अशी पदे स्वप्नातसुद्धा नलावडे यांना दिसली नसती, हे वास्तव स्वतः नलावडे विसरले असले तरी कणकवली विसरलेली नाही. समीर नलावडे राजकारणाच्या नकाशावर कुठेही नव्हते तेव्हा संदेश पारकर कणकवलीचे सरपंच होते. पारकर यांनी संघर्ष करून पद मिळवले होते. ते त्यांना नलावडे यांच्याप्रमाणे खैरातीत मिळालेले नव्हते. “उमेदवार पाहू नका, माझ्याकडे बघून मत द्या” असा प्रचार संदेश पारकर यांच्यासाठी कोणत्याही आमदाराने केलेला नव्हता.
नारायण राणे यांच्यावर संदेश पारकर या एकट्याच नेत्याने टीका केली नाही. आणखीही बऱ्याच नेत्यांनी राणे यांच्यावर शरसंधान साधले आहे. पण नलावडे यांचे प्रत्युत्तर मात्र फक्त पारकर यांना उद्देशून आहे. त्यामागचे गौडबंगाल काय आहे ? हे नलावडे यांनी स्पष्ट करावे. शिवसेनेत प्रवेश करण्याचा कटोरा घेऊन रत्नागिरीजवळच्या “पाली”ला कोण गेले होते ? तिथे कुणाला भेटले ? नव्या पक्षात “उदय” करून देण्याच्या विनंत्या कुणी आणि कुणाकडे केल्या ? आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी नेत्यांना ब्लॅकमेल कोण करतो आणि दुसऱ्या पक्षात जाण्याची धमकी कोण देतो ? हे देखील नलावडे यांनी स्पष्ट करावे.
जेव्हा नलावडे नव्हते आणि राणेही नव्हते तेव्हापासून पारकर राजकारणात आहेत. राणे यांनी शिवसेना, काँग्रेस आणि आता भाजप अशा पक्षांना लोंबकळून पदे मिळवली. आणि पदे मिळाल्यानंतर राणे त्याच पक्षांवर उलटले. पारकर यांनी पदाची अपेक्षाच कधी केली नाही. जी पदे मिळाली ती त्यांनी हिमतीवर मिळवली आहेत. पारकर यांनी कोणत्याही पक्षाशी गद्दारी केलेली नाही, म्हणून सर्व पक्षांत त्यांचे मित्रत्वाचे संबंध आजही आहेत. नलावडे यांनी राणे यांचा आणि स्वतःचाही दुसऱ्या पक्षातला एकतरी मित्र सांगावा.नेतृत्व हे गुणांवर ठरत असते. निवडणुकीत हारजीत होत असते. पारकर एकदा पराभूत झाले असतील तर स्वतः नारायण राणे दोनदा आणि निलेश राणे दोनदा पराभूत झाले आहेत. मग ते तुमचे नेते नाहीत का ? की ते पराभूत झाले म्हणून त्यांचे नेतृत्व नाकारणार आहात ?
पारकर यांचे नेतृत्व कणकवलीच्या पुरते मर्यादित नाही. ते जिल्ह्याचे नेतृत्व आहे. आणि आमच्यासारखे कार्यकर्ते कायम त्यांच्या पाठीशी आहेत आणि भविष्यातही राहतील. नलावडे यांनी त्याची काळजी करू नये. “पाली”ला कोण नगरसेवक गेले होते याचे उत्तर मात्र नलावडे यांनी आपल्या नेत्यांना आणि कणकवलीला नक्की द्यावे.
