*कोंकण एक्सप्रेस*
*वेंगुर्ले तालुक्यात २३ पैकी २० विकास संस्थानी केली १०० टक्के कर्ज वसुली : जिल्हा बँकेकडून सन्मान..*
*बँकेप्रमाणे सर्व प्रकारची कर्ज प्रकरणे आता विकास संस्था मधून मिळणार : मनीष दळवी*
*वेंगुर्ले : प्रथमेश गुरव*
विकास संस्था या सहकाराचा पाया आहे. सर्व विकास संस्था आता संगणकीकृत झाल्या असून यापुढे सर्व व्यवहार हे डिजिटल स्वरूपात असणार आहेत. त्या ही पुढे जाऊन नजिकच्या काळात बँकेप्रमाणे सर्व प्रकारची कर्ज प्रकरणे विकास संस्थांच्या माध्यमातून कशी देता येईल याकडे आमचा लक्ष आहे. थोडेफार नुकसान झाले तरी बँक ही भूमिका घेणार आहे. “विकास सहकारी संस्थांना अधिक सक्षम, गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कटिबद्ध असून, विकास संस्थांच्या पाठीशी बँक खंबीरपणे उभी राहील,” असा ठाम विश्वास जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी वेंगुर्ले येथे बोलताना व्यक्त केला.
वेंगुर्ला येथील साई डिलक्स हॉल, येथे मंगळवारी प्राथमिक विकास संस्था संवाद आणि सत्कार कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी अध्यक्ष मनिष दळवी बोलत होते. मेळाव्यात व्यासपिठावर जिल्हा बॅकेचे संचालक गजानन गावडे, रविंद्र मडगांवकर, सहकारातील ज्येष्ठ नेते एम के गावडे, नगरसेवक दाजी परब, कोचरा संस्थेचे चेअरमन विष्णू फणसेकर, माजी संचालिका प्रज्ञा परब, सहकार अधिकारी श्री आर. टी. चौगुले, भाजप वेंगुर्ले तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब, पंचायत समिती सदस्य श्री नितीन मांजरेकर, मच्छीमार नेते वसंत तांडेल, जिल्हा बॅकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, क्षेत्र वसुली सरव्यस्थापक दत्ताराम गावडे, कर्ज विभाग प्रमुख श्री. के बी.वरक, संगणक संस्था प्रमुख श्री.वसंत हडकर, तालुका विकास अधिकारी किशोर गोवेकर, विकास अधिकारी हर्षल मर्गज, वेंगुर्ला शाखा व्यवस्थापक श्री. बोडके तसेच संस्था अध्यश, उपाध्यश सचिव, संस्था सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. शंभर टक्के कर्ज वसुली करणाऱ्या विकास संस्थांचा यावेळी गौरव करण्यातआला. आहे.
३० जून अखेर पर्यंत वसुलपात्र बॅक कर्जा ची १०० टक्के वसुली केल्याबद्दल वेंगुर्ले तालुक्यातील सातेरी विकास संस्था वेतोरे, मातोंड विकास संस्था, सोमेश्वर विकास संस्था आडेली, स्वंयंमेश्वर विकास संस्था मठ, क्षेत्रपालेश्वर विकास संस्था होडावडा (संस्था स्तरावरही १००टक्के वसुली), गिरेश्वर विकास सोसा वजराट, अणसुर विकास सोसायटी, सिध्देश्वर विकास सोसायटी खानोली, आसोली विकास सोसायटी, म्हापण विविध कार्यकारी सेवा संस्था, कोचरा विकास सोसायटी, पाल विकास संस्था, दि वेंगुर्ला विकास संस्था, मोचेमाड विकास संस्था, केळुस विकास संस्था, उभादांडा विकास संस्था(संस्था स्तरावरही १००टक्के वसुली), रेडी विकास संस्था, दाभोली विकास संस्था, आरवली विकास संस्था आणि शिरोडा विविध कार्यकारी विकास संस्था अशा बँक स्तरावर १०० टक्के कर्ज पूर्ण फेड केलेल्या २० विकास संस्थांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव याचा सत्कार मनिष दळवी आणि मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच १०० टक्केच्या जवळपास पोहोचलेल्या उर्वरित तीन विकास संस्थाचे चेअरमन, उपाध्यक्ष, व सचिव व संचालक यांचाही सत्कार करून त्यांना पुढच्या वर्षी १००% काम करण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
सहकारातील युवा नेतृत्व मनीष दळवी यांच्या पाठीशी ठाम उभे राहूया : एम. के.गावडे
जिल्हा बँकेचे अध्यक्षपद मनीष दळवी यांच्याकडे आल्यानंतर बँकेने मोठी प्रगती केली आहे. यामध्ये त्यांचा नेतृत्व गुण, अभ्यासू वृत्ती, आणि सर्वांना बरोबर घेऊन चालणे यामुळे त्यांना हे यश मिळाले आहे. पूर्वीच्या विकास संस्था आणि आजच्या विकास संस्था यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आजच्या विकास संस्था डिजिटल झाले आहेत. ही आनंदाची बाब असून आज चांगले काम करणाऱ्या संस्थांचा होत असलेला सन्मान कौतुकास्पद आहे. त्यामुळे होऊ घातलेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सहकारातील युवा नेतृत्व मनीष दळवी यांच्या पाठीशी आपण सर्वांनी ठाम उभे राहूया आणि पुन्हा एकदा त्यांना अध्यक्षपदाची संधी मिळण्यासाठी प्रयत्न करूया असे आवाहन सहकारातील जेष्ठ नेते एम. के.गावडे यांनी केले. यावेळी माजी अध्यक्ष गजानन गावडे, बँक संचालक रवींद्र मडगावकर, संस्था चेअरमन प्रशांत प्रभुखानोलकर, आपा फणसेकर, निलेश सामंत, चित्रा कनयाळकर, दत्तात्रय उर्फ अण्णा वजराकर, पंचायत समिती सदस्य नितीन मांजरेकर यांनी ही आपले मनोगत व्यक्त करताना मनीष दळवी यांच्या कामाचे कौतुक करून विकास संस्थांना सक्षम करण्यासाठी करत असलेल्या कार्यक्रमाबाबत आभार मानले.
दरम्यान यावेळी बोलताना मनिष दळवी पुढे म्हणाले की, विकास संस्थानी कर्ज वाटप व वसुली या बरोबर आता अन्य व्यवसायाकडे लक्ष दिला पाहिजे. विकास संस्थानी
शेती व बिगर शेती कर्जासाठी लागणारा ९० ते १०० दिवसांचा कालावधी कमी करून नवीन प्रणालीद्वारे बिगर शेती कर्ज अवघ्या ७ दिवसांत मंजूर केले जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली.
संस्थांच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी नाबार्डच्या ४ टक्के व्याजदर योजनेअंतर्गत गोदाम बांधकामाकरिता मिळणाऱ्या ४० लाखांपर्यंतच्या कर्जातील १ टक्का व्याजही जिल्हा बँक स्वतः भरणार आहे. यामुळे विकास संस्थांना हे कर्ज शून्य टक्के व्याजदराने उपलब्ध होणार असून, सध्या जिल्ह्यात २२ हून अधिक संस्थांची गोदामांची मागणी असून यात वेंगुर्ले तालुक्यातील दोन तीन संस्थांचा समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय पीक विमा योजनेत आंबा, काजू आणि भातासोबत आता सुपारी व नारळ पिकांचाही समावेश करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे शेतकऱ्यांकडून त्याचा एपिक विमा उतरवण्याकडे लक्ष द्यावा असे आवाहन जिल्हा बॅकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई यांनी केल तर सूत्रसंचलन व आभार वजराट सोसायटीचे सचिव पांडूरंग दळवी यांनी मानले.

