*कोकण Express*
*“त्या” कामातील भ्रष्टाचाराविरोधात १५ ऑगस्टला प्रांत कार्यालयासमोर उपोषण…*
*संजू परबांचा इशारा ; शिवसेना-भाजपात शमलेला वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
महाराष्ट्र पर्यटन महामंडळाने केलेल्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. सावंतवाडी शहरातील जनरल जगन्नाथ राव भोसले उद्यान तसेच हेल्थ फार्म आदि कामाबाबत नगराध्यक्ष संजू परब यांनी तक्रारी केल्या असून, यावरून आमदार दीपक केसरकर यांच्यावर भ्रष्टाचारांचे आरोपही करण्यात आले होते. आरोप-प्रत्यारोपाची मालिका थांबते न थांबते तोच नगराध्यक्ष परब यांनी पर्यटन महामंडळाच्या सर्व कामांची चौकशी होत नाही तोपर्यंत आपण गप्प बसणार नसून त्यांनी या विरोधात येथील प्रांंताधिकारी कार्यालयासमोर १५ ऑगस्टला उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. याबाबतचे प्रसिद्ध पत्रक दिले असून,त्यात त्यांनी उपोषणामागचे कारण स्पष्ट केले.
चांदा ते बांदा योजनेतून मंजूरी देण्यात आलेल्या कामांमध्ये अनियमिता व भ्रष्टाचार झाला असून,त्यांची चौकशी होऊन संबधिता विरुध्द कारवाई होत नाही. त्यामुळे हे उपोषण करण्यात येणार आहे. सावंतवाडीप्रमाणे अनेक ठिकाणी पर्यटन विभागाने केलेली कामे ही चुकीची आहेत. त्यांची चौकशी होणे गरजेचे आहे.अन्यथा हा भ्रष्टाचार असाच वाढत जाईल, असे परब यांनी स्पष्ट केले. सन २०१६-१७ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या चांदा ते बांदा योजना मंजूर करण्यात आली असून, या योजनेमधून सावंतवाडी नगरपालिका हद्दीमध्ये तसेच आंबोली येथे कामांना दिलेली मंजुरी यातून चांगली कामे झाली नाहीत, अशा अनेक तक्रारी असून,कामे दर्जाहिन झाली आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने पालकमंत्री व अधिकारी यांच्या संगनमताने दर्जाहिन व चुकीच्या पध्दतीने कामे केली आहेत. त्यात शासनाचा कोट्यावधी रूपयांचा भ्रष्टाचार झाला आहे.याबाबत मी व्यक्तीशः संबधित यंत्रणेकडे वारंवार चौकशीची मागणी केली. परंतु राजकीय दबावाखाली तक्रारीची चौकशी करण्यात येत नाही. म्हणून हे उपोषण करत असल्याचे परब यांनी सांगितले आहे.परब हे १५ ऑगस्टला येथील उपविभागीय कार्यालयासमोर उपोषण करणार असून, या कामांची चौकशी होत नाही तो पर्यत हे उपोषण करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात येत आहे.सावंतवाडीतील पर्यटन विभागाची कामे येथील नगरपालिकेने अद्यापपर्यंत ताब्यात घेतली नाहीत.कारण या कामामध्ये मोठा भ्रष्टाचार आहे. असे नगराध्यक्ष यांचे म्हणने असून,त्यानी अलिकडेच या कामाची स्वतः पाहाणी ही केली होती. यावेळी त्यांच्या सोबत पर्यटन विभागाचे अधिकारी होते. त्यावेळी त्यांनी या कामामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराला आमदार दीपक केसरकर यांना जबाबदार धरले होते. त्यावरून दोघांंमध्ये आरोप-प्रत्यारोप ही झाले होते. सध्या ही टिका टिपण्णी थांबली असतनाच आता नव्याने परब यांंनी उपोषणाचे हत्यार उपसल्याने आता यावर शिवसेना कोणती भुमिका घेते, हे बघावे लागणार आहे.