*कोकण Express*
*‘ते’ आव्हान स्विकारण्याची निलेश-नितेश दोन्ही भावांमध्ये हिंमत नसल्याचे सिद्ध – सुशांत नाईक*
*पुन्हा एकदा समीर नलावडेंना पुढे करून प्रतिआव्हान दिल्यामुळे आम. नाईकांच्या ‘त्या’ दाव्याला पुष्टी!*
*नगरसेवक सुशांत नाईक यांनी लगावला प्रति टोला!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
आमदार वैभव नाईक यांनी निलेश राणे व नितेश राणे या दोघा भावांना हिंमत असेल तर खुल्या मैदानात उतरून दाखवण्याचे आव्हान दिले होते. मात्र हे आव्हान स्वीकारण्याची निलेश-नितेश या दोन्ही भावांमध्ये हिंमत नसल्याचे एव्हाना सिद्ध झालेले आहे. त्यासाठीच त्यांनी वैभव नाईकांविरोधात लोमत्यांना पुढे करून प्रतिआव्हान दिलेले आहे. मुळात आमदार वैभव नाईक यांचा आरोपच हा आहे की निलेश-नितेश हे दोन्ही भाऊ प्रत्यक्ष लढाईच्या वेळी स्वतः पळ काढतात आणि कार्यकर्त्यांना पुढे करतात. स्वभावतः भित्रे असल्यामुळे मैदानात येण्याची या दोघाही भावांना हिंमत होत नाही. निलेश-नितेश राणेंनी पुन्हा एकदा समीर नलावडेंना पुढे करून प्रतिआव्हान दिल्यामुळे आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या दाव्याला पुष्टी मिळाली आहे. असा प्रति टोला नगरसेवक सुशांत नाईक यांनी लगावला.
सुशांत नाईक पुढे म्हणाले, वैभव नाईक हे कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे लोकनिर्वाचित आमदार असताना कणकवली पुरते मर्यादित असलेल्यानी आमदार वैभव नाईक यांना आव्हान देऊ नये. मुळात समीर नलावडे आणि गोट्या सावंत या दोघांचीही कणकवली बाहेर काय पत आहे…? आव्हान देताना आणि स्वीकारताना आपल्याला समोरच्या माणसाची समाजातील आणि राजकारणातील नेमकी काय पत आहे. याचा सारासार विचार करावा लागतो. कुणाच्या आव्हानाकडे दुर्लक्ष करायचे याचे काही अलिखित नियम निसर्गानेच आखुन दिलेले असतात. राजकारणात सुद्धा एखादा आमदार दुसऱ्या आमदाराला किंवा एखादा मंत्री दुसऱ्या मंत्र्याला आव्हान देऊ शकतो. आमदारांना किंवा मंत्र्यांना आव्हान देण्यासाठी मुळात राजकारणात तितकी उंची गाठावी लागते. नगराध्यक्ष किंवा माजी जिल्हा परिषद अध्यक्षांचे ते काम नव्हे. कणकवलीचे नगराध्यक्ष असताना विधानसभेच्या सागरात पोहणाऱ्या आमदारांना आव्हान देणाऱ्या नलावडेंची गत डबक्यातल्या बेडकासारखीच झालेली आहे. आमदारांशी स्पर्धा करण्याच्या प्रयत्नात कधी नगराध्यक्ष पदाचा फुगा फुटेल हे त्यांचे त्यांनाही कळणार नाही. तसेच दहा वर्षापुर्वी वेंगुर्ला शहरात झालेल्या राड्यात भीतीने नितेश राणे जेव्हा शटर ओढुन कार्यालयात लपुन बसले होते, तेव्हा त्यांची सुटका करण्यासाठी गेलेल्या जिल्हाभरातील कार्यकर्त्यांमध्ये नारायण राणेंसोबत समीर नलावडे आणि गोट्या सावंत ही जोडी सुद्धा उपस्थित होती. त्यावेळी नितेश राणेंची वेंगुर्ल्यातुन सुटका झाली परंतु न्यायालयाने दिलेल्या निकालात समीर नलावडे आणि गोट्या सावंत या जोडगोळीला साडे सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यातील एक महिन्याची शिक्षा भोगून झाल्यानंतर आता उच्च न्यायालयाने दिलेल्या जामिनावर हे दोघेही बाहेर फिरत आहेत. हाणामारीच्या प्रकरणात दोषी ठरलेल्या समीर नलावडे व गोट्या सावंत यांनी राजकीय दहशतवादावर भाष्य करावे, यासारखा दुसरा कोणताही विनोद असु शकत नाही. तीन-चार दिवसापुर्वी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये अनौपचारिक गप्पा मारताना नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आमदार वैभव नाईक आम्हाला चालतील अशा शब्दात स्तुतीसुमने उधळली होती. जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी या घटनेचे साक्षीदार आहेत. आज तेच समीर नलावडे आपल्या नेत्यांना खुष करण्यासाठी आमदार वैभव नाईकांना आव्हान देत आहेत. मुळात भाजप व शिवसेना अशा दोन्ही दगडांवर पाय ठेवु पाहणाऱ्या समीर नलावडेंनी कुणाला आव्हान देण्याच्या भानगडीत पडुच नये. त्यांचा इतिहास रंगणातून पळ काढण्याचा आहे. वरवडेत सोनू सावंत यांच्या कार्यकर्त्यांना घाबरून त्यांनी पळ काढला होता. नलावडेंच्या आव्हानाला उत्तर देण्यासाठी कणकवलीतील शिवसेनीक पुरेसे आहेत. अशी टिका नगरसेवक सुशांत नाईक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
