*कोंकण एक्सप्रेस*
*ऑनलाईन संवाद पुरेसा नाही.!*
*दिव्यांगांच्या समस्यांसाठी प्रत्यक्ष बैठकीची मागणी धरतेय जोर.!*
*पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनी दिव्यांगांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बैठक जाहीर करावी.!*
*सिंधुदुर्ग*
राज्य शासनाच्या निर्देशानुसार विविध विभागांकडून ऑनलाईन प्रणालीद्वारे संवाद साधला जात असला तरी, जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना भेडसावणाऱ्या समस्यांचे प्रत्यक्ष आकलन होत नसल्याची भावना व्यक्त होत आहे. ऑनलाईन संवाद किती दिवस चालणार ? असा सवाल दिव्यांग बांधवांकडून उपस्थित केला जात आहे.
दिव्यांग व्यक्तींच्या दैनंदिन अडचणी, शासकीय योजनांचा लाभ मिळवताना येणाऱ्या अडथळ्यांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी प्रशासनाने समोरासमोर बैठक आयोजित करावी, अशी मागणी होत आहे.
ऑनलाईन पद्धतीत अनेकांना तांत्रिक अडचणी, इंटरनेटची समस्या तसेच संवादातील मर्यादा जाणवत असतात.
या पार्श्वभूमीवर, जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घेत, जिल्हास्तरावर स्वतंत्र बैठक जाहीर करून दिव्यांग व्यक्तींच्या समस्या थेट ऐकून घ्याव्यात, अशी मागणी जोर धरत आहे. या बैठकीत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती ठेवून तातडीने उपाययोजना आखाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या अडचणींना न्याय देण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने निर्णय घ्यावा, प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

