माझ्या विजयाने राष्ट्रीय पक्षांना त्यांची जागा दाखवून दिली – सुदेश आचरेकर

माझ्या विजयाने राष्ट्रीय पक्षांना त्यांची जागा दाखवून दिली – सुदेश आचरेकर

*कोंकण एक्सप्रेस*

*माझ्या विजयाने राष्ट्रीय पक्षांना त्यांची जागा दाखवून दिली – सुदेश आचरेकर*

*मालवण : प्रतिनिधी*

मालवण नगरपालिका निवडणुकीत मी सात वेळा निवडून आलो आहे. माझ्या प्रभागात मी केलेल्या कामाची पोचपावती जनतेने मला दिली असून माझ्या विजयाने राष्ट्रीय पक्षांना त्यांची जागा दाखवून देण्याचे काम आम्ही केले आहे. भाजपने माझ्यावर अन्याय करत भाडोत्री लोक आणून निवडणूक लढली, त्यामुळेच आज मालवण शहरातून भाजपला हद्दपार व्हावे लागले आहे, अशी टीका मालवणचे माजी नगराध्यक्ष आणि प्रभाग सात मधील विजयी अपक्ष उमेदवार सुदेश आचरेकर यांनी विजयानंतर पत्रकारांशी बोलताना केली.

यावेळी सुदेश आचरेकर म्हणाले, मालवण नगरपालिका निवडणूकीमध्ये प्रभाग सात हे सर्वांचे केंद्रबिंदू बनले होते. यामध्ये मला मित्रमंडळीने, माझ्या परिवाराने साथ दिली आणि ही निवडणूक जिंकून अपक्ष उमेदवाराची ताकद आज दाखवून दिली आहे. माझी पत्नी स्नेहा आचरेकर व सतीश आचरेकर यांनी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याने मला विजयी संपादन करता आला. प्रभागातील सर्वांनी केलेल्या कामाची पोचपावती मला या निवडणूकीमध्ये दिली आहे. नगरपालिका निवडणूकीमध्ये सातवेळा नगरसेवक म्हणून निवडून आलो आहे. राष्ट्रीय पक्षांना त्यांची जागा दाखवून देण्याचे काम आम्ही केले आहे. राष्ट्रीय पक्षाकडे कुठल्याही प्रकारचे नेतृत्व नसल्याने ते भाडोत्री नेतृत्व घेऊन याठिकाणी लढत देण्याचा प्रयत्न केला. आणि स्थानिक नेतृत्व गेली कित्येक वर्ष माझ्या सारख्या कार्यकर्त्यांनी भाजपचे व खासदार नारायण राणे यांचे काम केले, पण सातत्याने माझ्यावर अन्याय केला गेला. तसेच भाजप पक्षाने सुद्धा माझ्यावर अन्याय केला. परंतु आज मालवण शहरातून भाजपाला हद्दपार व्हायला लागल याचे कारण फक्त एकच भाडोत्री आणलेली लोक. जे दुसऱ्या पक्षामधून आता भाजपमध्ये आले असे त्यांना फक्त निवडणूक माहिती आहे दुसऱ्यांना मदत करणे हे त्यांना माहिती नाही. ते स्वतःच गद्दार असल्याने आणि त्यांच्याच हातात सर्व सूत्रे दिल्याने आज भाजपला हा पराभव पत्करावा लागला आहे. माझा विजय हा नेत्रदिपक विजय आहे. प्रभागातील ज्ञाती बांधव यांनी दाखविलेला विश्वास आज फळास आला आहे. नगराध्यक्ष पदासाठी महिला आरक्षण हे ओबीसी होते परंतु भाजप पक्षाने मराठा समाजाचा उमेदवार दिल्याने ओबीसी समाज संघटित होऊन ममता वराडकर यांना निवडून दिले. भाजप पक्षाने याचे आत्मपरिक्षण करावे. भाडोत्री लोकांना आणून निवडणूक जिंकता येत नाही हे पुन्हा एकदा मी दाखवून दिले आहे,असेही सुदेश आचरेकर म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!