*कोंकण एक्सप्रेस*
*व्यवसायाला साधनेची जोड दिल्यावर यशस्वी होता येते हा माझा स्वानुभव !*
*पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांचे प्रतिपादन*
*देवगड ः प्रशांत वाडेकर*
व्यवसाय किंवा उद्योग साधना म्हणून केल्यास त्यातूनही आध्यात्मिक प्रगती होऊ शकते, तसेच व्यवसायाच्या ठिकाणी सत्संग चालू केल्यास ते कार्यरत असलेल्यांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण होते. सत्संगातून प्रबोधन झाल्याने कर्मचारीही कामचुकारपणा न करता प्रामाणिकपणे काम करतात. त्याचा परिणाम चांगला होऊन व्यवसायवृद्धीही होते, हे मी स्वानुभवातून सांगतो, असे प्रतिपादन ‘पितांबरी उद्योग समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांनी येथे आयोजित कार्यक्रमात बोलतांना केले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालयात ‘उद्योगपती विशेष संवादा’चे आयोजन करण्यात आले होते. या विशेष संवाद कार्यक्रमाला तालुक्यातील ६५ व्यावसायिक उपस्थित होते. या वेळी रवींद्र प्रभुदेसाई यांनी, ‘उद्योग, व्यवसाय करतांना साधना म्हणून केल्यास ईश्वर प्राप्ती शक्य आहे. नियमित नामजप करून स्वत:च्या उत्पन्नातील काही वाटा अर्पण म्हणून प्रतिदिन बाजूला काढून ठेवा. यशस्वी होण्यासाठी नेमके धेय्य निश्चित करा आणि त्यादृष्टीने प्रयत्न करा. व्यवसाय करत असताना तोटा झाला, तरी साधनेचा पाया भक्कम असेल, तर खचून न जाता पुढील वाटचाल करता येते’, आदी सूत्रे सांगितली. या वेळी त्यांनी सनातन संस्थेचे कार्य आणि सनातनच्या मार्गदर्शनाखाली साधना केल्याने व्यावहारिक आणि आध्यात्मिक स्तरांवर झालेल्या लाभाचे स्वानुभव सांगितले.
या वेळी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांनी चैतन्यमय वाणीतून मार्गदर्शन करून सर्वांना साधनेविषयी कृतीशील होण्यास प्रवृत्त केले. काही जिज्ञासूंनी साधनेविषयीच्या शंकांचे निरसन करून घेतले. राजेंद्र पाटील यांनी फोंडा, गोवा येथे १७ ते १९ मे या कालावधीत होणार्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे स्वरूप स्पष्ट केले. सूत्रसंचालन सौ. वैदेही भुजबळ यांनी केले. कार्यक्रमाची सांगता सद्गुरूंचा श्लोक म्हणून करण्यात आली.