*कोंकण एक्सप्रेस*
*तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थी संगणक साक्षर असणे गरजेचे – जयेंद्र रावराणे*
*वैभववाडीतील पाच शाळांमध्ये 14 संगणक संचाचे वितरण*
*रेनोवेट इंडिया, मोसंबी व ऍड्राॅइट संस्थेचा स्तूत्य उपक्रम*
*वैभववाडी प्रतिनिधी–संजय शेळके*
संगणकाचे ज्ञान शालेय जीवनात प्रत्येक विद्यार्थ्याने आत्मसात केले पाहिजे. प्रत्येक क्षेत्रात संगणकाचे महत्व अनन्यसाधारण आहे. संगणक साक्षर विद्यार्थी जीवनात कधीच मागे राहणार नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सुविधांचा पुरेपूर उपयोग करून प्रगती साधली पाहिजे. असे प्रतिपादन वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष, तथा माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे यांनी व्यक्त केले.
वैभववाडी येथे अर्जुन रावराणे विद्यालयात रेनोवेट इंडिया, मोसंबी व ऍड्रॉइट यांच्या माध्यमातून वैभववाडी तालुक्यातील एकुण 5 शाळा व महाविद्यालयांना 14 संगणक संच प्रदान करण्यात आले. तहसीलदार सुर्यकांत पाटील व जयेंद्र रावराणे यांच्या हस्ते संगणक संचाचे वितरण करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे, पोलिस निरीक्षक सुनील अवसरमोल, गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे, मुख्याधिकारी प्रतिक थोरात, उपनगराध्यक्ष प्रदिप रावराणे, बांधकाम सभापती रणजित तावडे, संचालक विजय रावराणे, शरद नारकर, शिक्षण आरोग्य व क्रीडा सभापती रोहन रावराणे, सांगुळवाडी सरपंच बाळाजी रावराणे, प्रकाश पाटील. मोसंबी काॅर्पोरेटचे प्रणय घोगले, रेनोवेट इंडियाचे सहसंपादक प्रथमेश रावराणे व अलोक कदम,
सांगुळवाडी ग्रामस्थ विद्या प्रसारक संघ मुंबईचे अध्यक्ष शरदचंद्र रावराणे, सचिव चंदन जाधव, कोषाध्यक्ष किशोर रावराणे, उत्तम सुतार, सुरेंद्र रावराणे, व इतर मान्यवर उपस्थित होते. अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी, यशवंतराव चव्हाण विद्यालय अचिर्णे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अचिर्णे, जि.प.पूर्व प्राथमिक शाळा सांगुळवाडी नं.१, माध्यमिक विद्यालय करुळ या शाळांना एकुण 14 संगणक संच देण्यात आले.
मोसंबी व ऍड्रॉइट तसेच रेनोवेट इंडिया या संस्थेचे मागील तीन वर्षांच्या कार्याचा अहवाल प्रकाशन सोहळा यावेळी संपन्न झाला. तसेच संस्थेच्या कार्याचा आढावा घेणारी चित्रफीत यावेळी उपस्थितांना दाखविण्यात आली.
यावेळी तहसीलदार सूर्यकांत पाटील, सपोनि सुनील अवसरमोल, गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे, प्रतीक थोरात यांनी मनोगत व्यक्त केले. सांगुळवाडी ग्रामस्थ विद्या प्रसारक संघ मुंबई यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पालक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय मरळकर व आभार प्रदर्शन किशोर रावराणे यांनी केले.