*कोंकण Express*
*सिंधुदुर्गात रोजगार आणण्यासाठी खासदार कमी पडले..*
*प्रमोद जठार; महायुतीच्या उमेदवाराला जनता बहुमताने निवडून आणेल…*
*वेंगुर्ले ः प्रतिनिधी*
तब्बल दहा वर्षे खासदारकी भोगणारे विनायक राऊत सिंधुदुर्गात रोजगार आणण्यासाठी कमी पडले. मोबाईल टॉवर आणण्याच्या पलीकडे त्यांनी काही केले नाही, अशी टीका आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत भाजपचे नेते तथा लोकसभा प्रमुख प्रमोद जठार यांनी केली. दरम्यान या ठिकाणी भाजपला चांगला प्रतिसाद असून महायुतीच्या उमेदवाराला येथील जनता बहुमताने निवडून आणेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
श्री. जठार यांनी आज येथील भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.
यावेळी शरद चव्हाण, बाळू देसाई, सुहास गवंडळकर, दिलीप गिरप, प्रणव वायंगणकर, साईप्रसाद नाईक, बाबली वायंगणकर, दादा केळुसकर, वसंत तांडेल, साईप्रसाद नाईक, रवी शिरसाठ, सोमनाथ टोमके, अभी वेंगुर्लेकर, प्रसाद पाटकर, सारिका काळसेकर, वृंदा गवंडळकर, सौ. परब यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
श्री. जठार पुढे बोलताना म्हणाले की, भारतीय जनता पार्टी लोकशाहीच्या राष्ट्रीय महोत्सवाच्या स्वागताची सिद्धता करत आहे. भारतीय जनता पार्टीचा जाहीरनामा लोकोत्तर व्हावा यासाठी जाहीरनाम्यात मतदारांच्या सुचनांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न पक्षनेतृत्त्वाने केला आहे. याच अनुषंगाने लोकसभा प्रवास अंतर्गत वेंगुर्ले येथे भेटीगाठींचा कार्यक्रम चालू आहे. सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत आहे. यावेळी मोदी सरकारमध्ये ४०० पेक्षा जास्त खासदार असणार आहेत. त्यामुळे देशाच्या विकासाला अजून गतीं प्राप्त होणार आहे. आमच्या मतदारसंघाचा उमेदवार वरिष्ठ नेते दोन दिवसात जाहीर करतील. जो उमेदवार दिला जाईल त्याला भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.
पाच वर्षांपूर्वी निवडणुकीच्या वेळी आम्ही जाहीरनाम्यामध्ये जे जे सांगितले होते, ते पूर्ण केले आहे. कश्मीरी हिंदूचा प्रश्न, राम मंदिर, मुंबई गोवा महामार्गाचे काम प्रगतीपथावर, गरिबांना अंत्योदय योजनेमधून सक्षम करण्याचा प्रयत्न. अशा विविध प्रकारे भाजपाने काम केले आहे. यापुढे रोजगाराचा प्रमुख विषय आमच्या जाहीरनाम्यामध्ये असणार आहे. या भागात शिक्षण घेतलेल्या युवकांना येथेच रोजगार देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

