*कोकण Express*
*फोंडाघाट महाविद्यालयात मुंशी प्रेमचंद जयंती साजरी*
*समाज परिवर्तनाचा आरसा म्हणजे प्रेमचंद यांचे लेखन ; डॉ. संतोष रायबोले*
*फोंडाघाट : प्रतिनिधी*
येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट येथे मुन्शी प्रेमचंद जयंती साजरी करण्यात आली. महाविद्यालयाच्या हिंदी विभागामार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून विभाग प्रमुख डॉ. संतोष रायबोले बोलत होते. प्रेमचंद यांनी आपल्या जीवनात समाज सुधारण्यासाठी लेखन केले. विपरीत आर्थिक परिस्थितीत प्रेमचंद यांनी लेखन केले. आपल्याकडे सर्वच बहाणे असतात. पण प्रेमचंद यांनी आपल्या परिस्थितीचे कारण पुढे केले नाही. मुळात त्यांना वकील बनायचे होते परंतु घरच्या परिस्थितीमुळे त ते स्वप्न पूर्ण करू शकले नाहीत. परंतु मुळातच लेखकाचा पिंड असलेल्या प्रेमचंद यांनी समाजाभिमुख लेखन केले. आपल्या देशातील जातीयतेवर त्यांनी प्रहार केला. कष्टाला जात नसते परंतु कष्टाच्या फळाला मात्र जात चिटकते हीच या देशाची शोकांतिका आहे. जिवंत माणसाबरोबर जो व्यवहार होतो तो व्यवहार प्रेमचंद यांनी आपल्या साहित्यातून व्यक्त केला. त्यांचे लेखन पैसे किंवा पुरस्कारासाठी नव्हते तर ते समाज सुधारण्यासाठी होते. तुटपूंजा लेखन साहित्य सामग्रीत त्यांनी लेखन केले. गांधीजींच्या विदेशी विरोधाच्या सन्मानात त्यांनी चांगली शिक्षकाची नोकरी सोडली. प्रेमचंद यांचे लेखन हे वाचनीय असले तरी दर्शनीय ठरले नाही. हिंदी साहित्याला एक युग (1918 ते 1936) यांच्या नावाने ओळखले जाते. आपल्या मनोगतात त्यांनी प्रेमचंद यांच्या जीवनाचा पट उलगडून दाखवला.
अध्यक्ष भाषणात महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सतीश कामत यांनी हिंदी भाषेच्या सौंदर्यबाबत मत व्यक्त केले. हिंदीला उच्च स्थानावर पोचवण्यात ज्या काही लेखकांचे हात आहेत. त्यात प्रेमचंद यांचे मोठे योगदान आहे. जातीव्यवस्थेवरील त्यांचे प्रहार कठोर आहेत. ज्या काळात त्यांनी लेखन केले तो काळ जातिव्यवस्थेने भरलेला होता. म्हणूनच त्यांना उपन्यास सम्राट ही पदवी मिळाली. वास्तववादी लेखनात त्यांचा हातखंडा होता. असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने खुशी कामतेकर व वैष्णवी ढवण यांनी प्रेमचंद यांच्या कथांचे वाचन केले. कार्यक्रमाचे आभार प्रा. जगदिश राणे यांनी मांनले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचा सर्व कर्मचारी वर्ग व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

