*कोकण Express*
*शिवडाव धरणाचे पाणी गडनदीत दाखल*
*कणकवली शहरवासीयांची पाणीटंचाईतून सुटका*
*कणकवली ः प्रतिनिधी*
शिवडाव धरणाचे पाणी गडनदीपात्रात दाखल झाल्याने कणकवली शहरवासीयांची पाणी टंचाईतून सुटका झाली आहे. नळयोजनेचा पंप असलेल्या भागात पाण्याचा प्रवाह सुरू झाला. त्यामुळे नळयोजनेद्वारे शहराचा पाणी पुरवठा सुरू झाला आहे. शहरातील पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर आमदार नीतेश राणे यांनी काल नगरपंचायत मध्ये येऊन प्रशासक जगदीश कातकर, मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्याची चर्चा केली होती. दरम्यान पाणी पुरवठा सुरू झाल्याने कणकवली शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे. शिवडाव धरणाचे पाणी पुढील दोन ते तीन दिवसांत कलमठ, आशिये, वागदे गावच्या हद्दीत दाखल होण्याची शक्यता आहे. यंदा कणकवली तालुक्यात पूर्व मान्सूनच्या सरी बसरल्या नाहीत, तसेच केटी बंधाऱ्यामध्येही पुरेसा पाणी साठा झाला नव्हता. त्यामुळे कणकवली शहरासह लगतच्या गावांना एप्रिलच्या मध्यापासूनच पाणी टंचाईला सामोरे जावे लागले होते. कणकवली शहराची नळयोजना तर २ जून पासून बंद झाली होती. त्यामुळे शिवडाव धरणाचे पाणी गडनदीपात्रात सोडावे अशी मागणी नगरपंचायत प्रशासनाने पाटबंधारे विभागाकडे केली होती. आठ दिवसांपूर्वी शिवडाव धरणातील पाणी साठा गडनदीपात्रात सोडण्यात आला. आज सकाळपासून कणकवली शहर हद्दीत पाणी दाखल झाले. तातडीने शहराची नळयोजना कार्यान्वित करण्यात आली असल्याची माहिती नगरपंचायत प्रशासनाकडून देण्यात आली.