*कोकण Express*
*रत्नागिरीत ६ एप्रिल रोजी निघणार स्वा. सावरकर गौरव यात्रा*
*रत्नागिरी ः प्रतिनिधी*
स्वा. विनायक दामोदर सावरकर यांचा टोकाचा विरोध करणाऱ्या कॉंग्रेस आणि राहुल गांधी यांच्यापर्यंत सावरकरांचे विचार पोहोचवून सकारात्मक पद्धतीने विरोध करण्याचा निर्णय भाजप शिवसेना युतीने घेतला असून त्यासाठी राज्यभरात ‘स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रे’चे आयोजन आले आहे. या जिल्ह्यात देवरुख, राजापूर आणि रत्नागिरी या ३ ठिकाणी अनुक्रमे ४, ५ आणि ६ एप्रिल दरम्यान ही यात्रा काढली जाणार आहे अशी माहिती भाजपाचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल जनमानसांमध्ये नितांत आदर आहे. मात्र काँग्रेस व काँग्रेसचे नेते राहुल गांधी स्वा. सावरकरांचा वारंवार अपमान करीत आहेत. याबद्द्दल कॉंग्रेस आणि गांधी यांचा निषेध करण्यात आला आहे. मात्र या टोकाच्या सावरकर विरोधाला सकारात्मक पद्धतीने उत्तर देण्यासाठी आणि सावरकरांबद्दल आदर, प्रेमभाव व्यक्त करण्यासाठी भाजपा शिवसेनेच्या वतीने ही गौरव यात्रा १ एप्रिल पासून राज्यात काढण्यात येणार आहे. स्वा. सावरकर यांनी सामाजिक समरसतेचा पाया रत्नागिरीत असताना घातला. इथल्या कारागृहातील शिक्षा आणि इथली स्थानबद्धतेच्या वर्षांची नोंद इतिहासाने घेतली असून त्यांचे रात्नागीरीशी नाते वेगळेच होते. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात निघणाऱ्या गौरव यात्रेला विशेष महत्त्व आहे. रत्नागिरीतील ३ तालुक्यात या स्वा. सावरकर गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये देवरुख येथे ४ एप्रिलरोजी, राजापूर येथे ५ एप्रिलरोजी तर रत्नागिरी येथे ६ एप्रिल रोजी गौरव यात्रा निघणार आहे.
रत्नागिरीतील यात्रेला प्रारंभ होणार आहे. त्या आधी विशेष कारागृहातील असणाऱ्या सावरकरांच्या कोठडीतील तसबिरीला पुष्पहार अर्पण करून या यात्रेला प्रारंभ होणार आहे. त्यानंतर कारागृह जेल नाका मार्गे ही यात्रा स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात पोहोचणार आहे. या ठिकाणी सावरकर प्रेमी व प्रमुख मान्यवर आपले मनोगत व्यक्त करणार आहेत. या गौरव यात्रेमध्ये जिल्ह्यातील सर्व सावरकर प्रेमींनी सहभागी व्हावे असे आवाहन दक्षिण रत्नागिरी भाजपाचे जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले आहे.