तळेरे पंचक्रोशीतील अनियमित वीज पुरवठ्याची मोठी समस्या

तळेरे पंचक्रोशीतील अनियमित वीज पुरवठ्याची मोठी समस्या

*कोकण Express*

*तळेरे पंचक्रोशीतील अनियमित वीज पुरवठ्याची मोठी समस्या*

*सामाजिक कार्यकर्ते तथा ह्युमन राईट्स असोसिएशनचे कणकवली तालुका उपाध्यक्ष राजेश जाधव यांचाआक्रमक पवित्रा!*

तळेरे पंचक्रोशीतील अनियमित विज पुरवठ्याच्या समस्येबाबत आवश्यक ती ठोस अथवा पर्यायी उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून महावितरण कंपनीचे संबंधित अधिकारी कोणतीच नियमोचित कार्यवाही करीत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते तथा ह्युमन राईट्स असोसिएशनचे कणकवली तालुका उपाध्यक्ष राजेश जाधव महावितरण कंपनीच्या विरोधात लोकशाही मार्गाने आक्रमकरित्या आंदोलनात्मक पवित्रा घेतला आहे.

तळेरे पंचक्रोशीत गेल्या काही दिवसांपासून सतत अनियमित वीज पुरवठा सुरू आहे. दिवसा व रात्री किमान १५ ते २० वेळा वीज पुरवठा खंडित होतो. याचा विपरीत असा परिणाम सर्वसामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन, व्यापारी वर्गाचे उद्योग – व्यवसाय – धंदे, विद्यार्थी वर्गाची शिक्षण व्यवस्था, शेतकरी वर्गाची यांत्रिक शेती, वैद्यकीय सोई – सुविधा, वित्तीय संस्थाच्या सोई – सुविधा, शासकीय कामकाज इ. एक ना अनेक बाबींवर होत आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेस नाहक मानसिक व आर्थिक त्रासास देखील सामोरे जावे लागत आहे.

सदरची समस्या सामाजीककदृष्ट्या गंभीर असून त्याकडे महावितरण कंपनीच्या संबंधित अधिकारी वर्गाने वेळीच लक्ष देणे व त्याबाबत आवश्यक ती ठोस अथवा पर्यायी उपाययोजना विनाविलंब, तातडीने व तात्काळ करणे गरजेचे होते व आहे. परंतु असे झालेले अथवा होत असलेले दिसून येत नाही.

वस्तुतः महावितरण कंपनीकडून वीज बिलात स्थिर आकार, इंधन भार, वहन भार, सुरक्षा ठेव इ. विविध प्रकारचे कर ग्राहकास आकारले जातात व ते दारामहाच्या वीज बिलातून नियमित वसूल देखील केले जातात. असे असताना दरमहा नियमित वीज बिल भरणा करणाऱ्या महावितरण कंपनीच्या ग्राहकास कायमस्वरूपी नियमित सुरळीत वीज पुरवठा करणे व त्यादृष्टीने वेळोवेळी आवश्यक त्या कायमस्वरूपी उपाययोजना, देखभाल, दुरुस्ती, देखरेख करणे हे देखील महावितरण कंपनीचे आद्य कर्तव्य असून ते महावितरण कंपनीवर कायदेशिररित्या बंधनकारक आहे. यांस केवळ महावितरण कंपनीच्या अधिकारी वर्गाची आपल्या कार्य- कर्तव्यातील निष्क्रियता अथवा अनास्थाच म्हणावी लागेल.

तळेरे पंचक्रोशीततील विजेच्या अनियमित पुरावठ्याच्या समस्येबावत महावितरणच्या अधिकारी वर्गाशी संपर्क केला असता त्यांचेकडून काही वेळा 11 केव्ही अथवा बहुतांश वेळा 33 केव्ही वीज वाहिनीत बिघाड झाल्याचे कारण सांगण्यात येते. तसेच 33 केव्ही वीज वाहिनीतील बिघाडाबाबत “आम्ही काय करू शकतो?” असा प्रश्न महावितरणचे अधिकारी ग्राहकालाच विचारून “त्याबाबत वरिष्ठांशी संपर्क करा ” असे बेजबाबदार उत्तर ग्राहकाला देत आहेत.

सबब सदर सर्व बाबी व समस्येच्या निवारणाच्या अनुषंगाने आवश्यक ती ठोस अथवा पर्यायी उपाययोजना महावितरण कंपनीने विनाविलंब, तातडीने व तात्काळ करावी, याकरिता महावितरण कंपनीच्या संबंधित अधिकारी वर्गाशी शांततामय मार्गाने सकारात्मक चर्चा लेखी निवेदन देऊन करण्यात आलेली आहे. तरी देखील महावितरण कंपनीच्या संबंधीत अधिकारी वर्गाने योग्य ती दखल न घेतल्यास व येत्या चार दिवसांत समस्या ‘जैसे थी वैसी’ राहिल्यास,महावितरण कंपनीच्या संबंधित अधिकारी वर्गास ग्राहकांना वीज बिल भरणा करणेची सक्ती अथवा ग्राहकांचे वीज कनेक्शन बंद करणे इ. प्रकारची कार्यवाही करू देणार नाही. अन्यथा नाईलाजाने लोकशाही व संविधानिक मार्गाने महावितरण कंपनीच्या संबंधित अधिकारी यांचे विरोधात तीव्र जनआंदोलन छेडले जाईल. असा गंभीर इशारा सामाजिक कार्यकर्ते तथा ह्युमन राईट्स असोसिएशनचे कणकवली तालुका उपाध्यक्ष राजेश जाधव यांनी महावितरण कंपनीस दिला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!