*कोकण Express*
*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनांना टोलमाफी मिळालीच पाहिजे अशी आमची मागणी*
*महामार्गाची टोलवसुली करण्यापूर्वी रस्त्यासंदर्भातील सर्व प्रश्न आधी सोडवा ; आ. नितेश राणे*
*जिल्ह्यातील हायवे चे प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत प्रांताधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांनी टोल सुरू करू नये*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनांना टोलमाफी मिळावी आमची मागणी आहे. यामध्ये काही वेगळी भूमिका घेण्याची गरज नाही. महामार्गाची टोलवसुली करत असताना रस्त्यासंदर्भातील सर्व प्रश्न आधी सोडवा; काही जमीनमालकांना अद्याप मोबदला मिळाला नाही. सर्विस रस्त्याचा प्रश्न मार्गी लागले पाहिजेत. जोपर्यंत जिल्ह्यातील हायवे चे प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत प्रांताधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांनी टोल सुरू करता नये अशी भूमिका आमदार नितेश राणे यांनी घेतली. उगाच रस्त्यावर बसून पॅन्ट खराब करण्यापेक्षा आणि गॉगल लावून फोटो काढण्यापेक्षा MH07 वाहनांना टोलमाफी मिळालीच पाहिजे अशी सर्व जणांची मागणी आहे. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री म्हणून नारायण राणे असल्यामुळे याप्रश्नी विरोधकांना जास्त वेळ विषय ताणता येणार नाही. सिंधुदुर्गातील वाहनांना टोलमाफी देण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक आहे. केंद्र सरकारमध्ये नारायण राणे असल्यामुळे आम्हाला वेगळं काही मागण्याची किंवा आंदोलन करण्याची गरज भासणार नाही. याचा आम्हाला विश्वास आहे. आम्ही यापूर्वीही अशी भूमिका घेतली आहे की 100 टक्के जमीनमालकांना मोबदला द्या, रस्त्या संदर्भातील सर्व प्रश्न सोडवा अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे हे सर्व मार्गी लागत नाही तोपर्यंत संबंधित कंपनीला थांबवायची भूमिका ही प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकारी यांची असणार आहे. जमिनीचा मोबदला किंवा त्या अनुषंगाने अन्य मागण्या असतील त्या आम्ही प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी करणार. त्यामुळे त्यांनी यासंदर्भात संबंधित कंपनीला सूचना देण्याची गरज आहे. महामार्गाचे चौपदरीकरण होत असताना विषय ताणल्यानंतर गाड्या कशा उपलब्ध होतात हे सिंधुदुर्गवासियांनी पाहिलेल आहे. भाजपा पक्षाचं सरकार केंद्रात आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग पासिंगच्या MH07 वाहनांना टोलमाफी मिळणार म्हणजे मिळणारच असा ठाम विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला. त्यामुळे कुणी काय म्हणतं त्यापेक्षा जनतेला काय पाहिजे त्यानुसार केंद्रीयमंत्री नारायण राणे काम करणार आहेत. आमदार वैभव नाईक यांनी वागदेमध्ये आपली पॅन्ट खराब करण्यापेक्षा कुडाळ-मालवणमध्ये रस्ते, बंधारे नसल्यामुळे त्यांच्या नावाने तेथील जनता बोंब मारत आहे. तिथे त्यांचं जास्त लक्ष असलं पाहिजे. तिथे लक्ष केंद्रित करा. इथे जर 2024 मध्ये लढायचं असेल, माझ्यासमोर उभे राहायचं असेल तर तुमचं स्वागत आहे असा टोला देखील आमदार नितेश राणे यांनी लगावला. त्याचबरोबर त्यांच्या आजूबाजूला बसतात त्यांनाही नाईक यांनी शांत बसवावं. नाहीतर कणकवली विधानसभेसाठी अजून एक सातवा उमेदवार तयार होईल, असा चिमटा देखील राणे यांनी काढला.