*…मग गेल्या पाच वर्षात गृहराज्यमंत्री असताना केसरकर झोपले होते का..?*
*मनसेचे राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर*
*मालवण ः प्रतिनिधी*
जिल्ह्यात पर्यटनाच्या दृष्टिकोनातून पोलिस ठाणी निर्माण करण्याची गरज असल्याचे माजी पालकमंत्री दीपक केसरकर हे म्हणत आहे. मग गेल्या पाच वर्षात राज्याचे गृह राज्यमंत्री असताना ते झोपले होते का? असा प्रश्न मनसेचे राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी उपस्थित केला आहे.
जिल्ह्यात पर्यटनाच्या दृष्टिकोनातून स्वतंत्र पोलिस ठाणी निर्माण करण्याची गरज असल्याचे माजी पालकमंत्री केसरकर यांनी म्हटले होते. यावर बोलताना श्री. उपरकर म्हणाले, पर्यटन जिल्हा होऊन बऱ्याच वर्षाचा कालावधी उलटला आहे. मात्र सत्तेत असताना आणि राज्याचे गृह राज्यमंत्री असताना केसरकर यांना जिल्ह्यात पर्यटनाच्या दृष्टीने पोलिस ठाणी हवी हे सुचले नाही. आता त्यांना याची गरज असल्याचे दिसून येत आहे. त्यावेळी त्यांना जिल्ह्यात सुरू असलेला मटका, जुगार दिसला नाही आता तो दिसतो यावरून ते सर्वसामान्यांना आपण काहीतरी करत आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका श्री. उपरकर यांनी केली आहे.