*कोकण Express*
*आमदार वैभव नाईक : प्रत्यक्ष रणांगणात उतरणारा लढवय्या…!*
*सिंधुदुर्ग ः संंजना हळदिवे*
बुद्धिबळाच्या खेळाची एक अनोखीच खासियत असते. या खेळात पटाच्या दोन्ही बाजूचे वजीर, उंट, घोडे, हत्ती आणि प्यादी आपापल्या राजाला वाचवण्यासाठी एकमेकांविरोधात लढतात. त्याचवेळी दोन्ही बाजूंचे राजे मात्र प्रत्यक्ष युद्धात कोणत्याही प्रकारचा सक्रिय सहभाग न घेता, आपल्याच जागेवर राहुन सैन्याची कत्तल शांतपणे पाहत असतात. शेवटी या धुमश्चक्रीत धारातीर्थी पडतात ती दोन्ही बाजूंची प्यादीच…! राजकारणात आणि बुद्धिबळाच्या खेळात प्रचंड साधर्म्य आहे. राजकारणात सुद्धा अनेक डाव-प्रतिडाव खेळले जातात. नेतेमंडळी एकमेकांना पाहुन दंड थोपटतात. कधीकधी दोन्ही बाजुच्या नेत्यांनी एकमेकांना दिलेल्या आव्हानांमुळे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते पेटुन उठतात, राजकीय वातावरण तापते आणि मग भर रस्त्यात तुफान राडे होतात. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते पुर्ण आवेशामध्ये एकमेकांवर तुटून पडतात, हातात लाठ्याकाठ्या घेऊन एकमेकांची डोकी फोडतात आणि त्याठिकाणी रक्ताच्या चिळकांड्या उडतात. या हाणामारीत काहीजण कायमचे जायबंदी होतात तर काहीजण कित्येकदा प्राणाला सुद्धा मुकतात. कधीकधी मला प्रश्न पडतो की प्रत्यक्ष रस्त्यावर ही तुंबळ हाणामारी सुरु असताना दोन्ही बाजुच्या कार्यकर्त्यांना प्रक्षोभक वक्तव्ये करून भडकवणारी नेतेमंडळी त्यावेळी कुठल्या बिळात दडून बसलेली असतात…? हे नेते आपापल्या कार्यालयात एसी केबिनमध्ये बसुन टेलिव्हिजनवर कार्यकर्त्यांच्या राडेबाजीचा लाईव्ह आस्वाद घेत असतात. त्यांना कसलेही सोयरसूतक नसते. अगदीच काही कार्यकर्ते या हाणामारीत जखमी किंवा जायबंदी झाले तर त्यांना हॉस्पिटलमध्ये भेट दिली की संबंधित नेत्याचे उत्तरदायित्व संपते. एखाद्या राड्यामध्ये कधी कोणता नेता रस्त्यावर उतरून विरोधकांसोबत हाणामारी करताना पाहिलाय का…? महाराष्ट्राच्या राजकारणात नेत्यांची अशी मोजकीच उदाहरणे देता येतील जे स्वतःची अथवा पक्षाची लढाई लढण्यासाठी कार्यकर्त्यांसमवेत स्वतः रस्त्यावर उतरले आहेत. या प्रकारातले नेते प्रसंगी कार्यकर्त्यांसमवेत लाठ्याकाठ्यांचा मार खातात, पोलीसांच्या केसेस अंगावर घेतात पण संघर्षाच्या वेळी घरात लपुन बसत नाहीत. आपल्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांना मार खाण्यासाठी वाऱ्यावर सोडत नाहीत. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणाचा विचार केला असता या दुर्मिळ नेत्यांच्या यादीत ज्या नेत्याचे नाव प्राधान्याने घ्यावे करावे लागेल तो नेता म्हणजे- आमदार वैभव विजय नाईक…!
सिंधुदुर्ग जिल्ह्याने असेही बोलघेवडे नेते बघितले आहेत जे रोज सकाळी ट्विटरवर टिव्ह टिव्ह करून महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष वेधून घेण्यासाठी फुकटचा टिवटिवाट करतात. हे बोलबच्चन नेते ट्विटरवरून पाकिस्तानचे पंतप्रधानच काय तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षावरही तोफ डागुन आव्हान देतील. मात्र प्रत्यक्षात रस्त्यावर उतरून लढाई करण्याची वेळ येईल तेव्हा समोर शत्रु दिसताच रणांगणातुन पळ काढतील. कार्यकर्त्यांची ढाल करून आपला जीव वाचवणारी आणि प्रत्यक्ष लढाईसाठी रस्त्यावर कधीच न उतरणारी ही भित्र्या नेत्यांची जमात आपल्या गाडीच्या मागे-पुढे काळ्या गणवेशातील बॉडीगार्डनी भरलेल्या गाड्या घेऊन राजकीय विरोधकांना आव्हान देण्यात धन्यता मानते. अशा रणछोडदास नेत्यांच्या जमान्यात निधड्या छातीचे वैभव नाईक आपले स्वतंत्र-निर्भीड व्यक्तिमत्व टिकवून आहेत, हेही नसे थोडके…! काही जणांना आमदारकी वारसाहक्कामध्येच मिळते… काही जणांना ती एखाद्या विशिष्ट धर्माचे अथवा जातीचे प्रतिनिधीत्व केल्यामुळे मिळते… काही जणांना ती पक्षश्रेष्ठीच्या मेहरबानीतुन मिळते… तर काही जणांना ती संघर्षातुन मिळते…! जेव्हा आमदारकीला संघर्षाचे कोंदण असते, तेव्हा तिला हिंमतीचे चारचाँद लागतात. वैभव नाईकांना मिळालेल्या आमदारकीला राजकीय संघर्षाची पार्श्वभुमी आहे. तोही साधासूधा संघर्ष नव्हे…! पंचवीस वर्षांच्या रक्तरंजित संघर्षाची ती देण आहे. त्यामुळेच त्यांच्या आमदारकीचे तेज हे इतरांपेक्षा कैक पटीने जास्त आहे कारण त्याभोवती संघर्षाच्या जळजळीत निखाऱ्यांची धग आजही तशीच कायम आहे.
वैभव नाईक यांनी २००८ साली शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्यांची थेट शिवसेना जिल्हाप्रमुख पदी नेमणुक करण्यात आली. अवघ्या वर्षभरात विधानसभेच्या निवडणुका होत्या आणि नव्यानेच निर्माण झालेल्या कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात नारायण राणेंचे आव्हान स्वीकारण्यास शिवसेनेकडून कुणीही नेता फारसा उत्सुक नव्हता. तसेही राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेल्या नारायण राणेंना त्यांच्याच बालेकिल्ल्यात आव्हान देणे म्हणजे साक्षात दगडावर डोके आपटून कपाळमोक्ष होण्यासारखेच होते. अशा प्रतिकुल परिस्थितीत वयाची अवघी ३३ वर्षे पुर्ण केलेल्या वैभव नाईकांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी देऊ केली. त्यावेळी पुर्ण भरात असलेल्या नारायण राणेंविरोधात विधानसभा निवडणुकीची उमेदवारी स्वीकारणे म्हणजे ओसाड गावची पाटीलकी स्वीकारण्यासारखेच होते. त्याकाळी नारायण राणेंविरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजय मिळवण्याचे कुणी साधे स्वप्न जरी पाहिले असते तरी लोकांनी त्याला वेड्यातच काढले असते. अशा प्रतिकुल परिस्थितीत वैभव नाईकांनी शिवसेनेने दिलेली विधानसभा निवडणुकीची उमेदवारी स्वीकारली कारण त्यांच्यासमोर प्राप्त परिस्थितीत संघर्ष करणे एवढा एकच पर्याय शिल्लक होता. नारायण राणेंविरोधात नाईक कुटुंबीयांचा संघर्ष हा आजन्म सुरु राहणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. फक्त शिवसेनेने दिलेल्या विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीमुळे राणे विरुद्ध नाईक कुटुंबातील संघर्ष पुन्हा एकदा थेट निवडणुकीच्या रणांगणात येऊन पोहोचला. त्याअगोदर १९९५ सालच्या विधानसभा निवडणुकीत वैभव नाईक यांचे वडील स्वर्गीय विजयराव नाईक यांचा कणकवली-मालवण मतदारसंघात पराभव करणारे नारायण राणेच होते.
२००९ सालच्या विधानसभा निवडणुकीत वैभव नाईकांसाठी विजयाची कुठलीही सुतराम शक्यता नव्हती पण जीवावर बेतण्याचे प्रसंग एकदा नव्हे तर दोन वेळा उद्भवले. सुदैवाने परमेश्वराच्या कृपेने वैभव नाईक त्या दोन्ही खडतर प्रसंगातून सहीसलामत बाहेर पडले. मतदानाच्या आदल्या दिवशी रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात मालवण तालुक्यात भाडोत्री गुंड व शस्त्रास्त्रांनी भरलेल्या दोन-तीन गाड्यांनी निर्जन रस्त्यावर वैभव नाईकांच्या गाडीचा पाठलाग सुरु केला. त्यांच्या ड्रायव्हरने सुमारे अर्धा-पाऊण तास गाडी पुर्ण वेगाने पळवली आणि मालवण पोलीस स्टेशनला आणली. त्यामुळे भाडोत्री गुंडांपासुन त्यांचा जीव वाचु शकला. दुसऱ्या दिवशीच विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होते. त्यांना आदल्या रात्री घडलेल्या प्रकारामुळे जो मानसिक धक्का बसला होता त्यातुन सावरायला वेळच मिळाला नव्हता आणि दुसरे संकट जणू काही रस्त्यावर वाट पाहत थांबले होते. सर्वत्र निवडणुकीसाठी मतदान सुरु असताना माणगावमध्ये वैभव नाईकांवर एका माथेफिरूने रिवॉल्व्हर रोखली. फक्त काही क्षणांचा विषय होता आणि एका क्षणात होत्याचे नव्हते झाले असते. मात्र त्या जीवघेण्या प्रसंगाला अतिशय धीरोदात्तपणे सामोरे जात वेळीच प्रसंगावधान राखल्याने ते पुन्हा एकदा जीवानीशी वाचले. दोन दिवसात दोन जीवघेणे हल्ले झाल्यानंतर त्यांच्या घरातील आई, वडील, पत्नी, मुलगी, भाऊ, वहिनी असे सर्वच जण घाबरले होते. यापूर्वीच श्रीधर नाईकांच्या रूपाने आपल्या घरातील कर्ताधर्ता मुलगा नाईक कुटुंबियांनी गमावला होता. आता श्रीधर नाईकांचा पुतण्या असलेल्या वैभववर सुद्धा तशाच प्रकारचे दोन जीवघेणे हल्ले दोन दिवसात झाल्यामुळे भयभीत झालेल्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांना राजकारण सोडण्यास सांगितले. त्याक्षणी एखाद्याने सदसदविवेकबुद्धी शाबुत ठेवुन विचार केला असता तर नारायण राणेंचा पराभव होण्याची कसलीही सुतराम शक्यता नव्हती. राजकारण हे वैभव नाईकांच्या उदरनिर्वाहाचे साधन कधीच नव्हते. आपल्या क्रशरच्या व्यवसायात ते पुर्णपणे सेटल झाले होते. त्यांच्या जागी कुणीही शहाणा माणुस असता तर त्याने उगाचच आपल्या जीवाची बाजी लावुन राजकीय संघर्ष करत राहण्यापेक्षा आपला व्यवसाय सांभाळून सुखा-समाधानाने आयुष्य जगणे पसंत केले असते. काही माणसे जन्माला येतानाच संघर्षासोबत हातमिळवणी करून आलेली असतात. ‘तंटा नाय तर घंटा नाय’ या उक्तीप्रमाणे संघर्षाशिवाय त्यांच आयुष्य कधी पुर्णच होऊ शकत नाही. वैभव नाईक हे त्यापैकीच एक होते. त्याक्षणी त्यांच्यासमोर जीवन जगण्याचे फक्त दोनच पर्याय उपलब्ध होते. त्या पर्यायापैकी बिझनेसमन होऊन आयुष्य शांततेने जगण्याचे रेड कार्पेट त्यांनी कधीच स्वीकारले नाही. राजकीय संघर्षाची काटेरी वाटच त्यांनी पुढच्या प्रवासासाठी निवडली. त्या काटेरी वाटेवरून चालत असताना अनेकदा त्यांच्या पायात काटे घुसले, प्रसंगी रक्तही सांडले. मात्र त्याच वाटेवर त्यांना ‘आमदारकी’चे अमुल्य फळ सुद्धा मिळाले.
“पदोपदी पसरून निखारे आपुल्याच हाती… होऊनिया बेहोष धावलो ध्येयपथावरती… कधी न थांबलो विश्रांतीस्तव पाहिले न मागे… बांधू न शकले प्रीतीचे वा कीर्तीचे धागे…” कवी कुसुमाग्रजांच्या या ओळी वैभव नाईक यांना तंतोतंत लागु पडतात. म्हणुनच मी लेखाच्या सुरुवातीलाच म्हटले आहे की इतरांपेक्षा वैभव नाईकांच्या आमदारकीला जास्त तेज आहे कारण त्यांना मिळालेली आमदारकी हे अनेक वर्षांच्या राजकीय संघर्षाचे अपत्य आहे. त्यासाठी अनेक लढाया कधी रस्त्यावर तर कधी आपल्याच मनात त्यांना लढाव्या लागल्या आहेत. त्यानंतरच ही फलप्राप्ती झालेली आहे. त्यांचे अनेक राजकीय विरोधक खाजगीत बोलताना अतिशय कुत्सितपणे म्हणतात की २०१४ साली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेमध्ये राणेविरोधी लाट तयार झाल्यामुळे वैभव नाईकांना आमदारकीची लॉटरी लागली. २०१४ साली सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणेविरोधी लाट निश्चितपणे तयार झाली होती पण वैभव नाईक यांनी २००९ साली विधानसभा निवडणुकीचे शिवधनुष्य उचलले तेव्हा असली कोणतीही लाट सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्हती. पुढची पाच वर्षे शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणुन ते जनतेमध्ये मिसळले, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, जनतेवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली आणि या सर्वाचा परिपाक म्हणुन २०१४ साली सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणेविरोधी लाट तयार झाली. आमदारकीची कधीही लॉटरी लागत नसते. त्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागतो, कौटुंबिक सुखांचा त्याग करावा लागतो, अनेक गोष्टींची तडजोड करावी लागते आणि त्या तपश्चर्येनंतर आमदारकीचा मुकुट आपल्या डोक्यावर विराजमान होतो. अशा प्रकारे २००९ साली मिळालेल्या ओसाड गावच्या पाटीलकीचे पाच वर्षात दिवसरात्र प्रचंड मेहनत करून नंदनवन करणारा किमयागार हीच आमदार वैभव विजय नाईक यांची खरीखुरी ओळख आहे.
दिनांक २४ नोव्हेंबर २०१३ रोजी कणकवली शहरात झालेला आमनेसामने राडा हा वैभव नाईकांच्या संपुर्ण राजकीय कारकिर्दीला कलाटणी देणारा ठरला. किंबहुना त्याच दिवशी त्यांच्या आमदारकीवर खऱ्या अर्थाने शिक्कामोर्तब झाले. विधानसभा निवडणुकीतील विजय ही तर फक्त औपचारिकता शिल्लक राहिली होती. शिवसेना व राणे समर्थक नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोपातून आमने-सामनेची संकल्पना पुढे आली. कणकवलीतील बालेकिल्ल्यात राणे समर्थकांना अंगावर घेणे म्हणजे वाघाच्या गुहेत जाऊन त्याच्याच शेपटीला हात घालण्यासारखे होते. मात्र जेव्हा शिवसेनेच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा जिल्हाप्रमुख असलेल्या वैभव नाईक यांनी राणे समर्थकांनी दिलेले ‘आमने-सामने’चे आव्हान स्वीकारले. राणे समर्थकांनी खचाखच भरलेल्या मराठा मंडळाच्या सभाग्रुहात ते एकट्यानेच घुसले. त्यांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला आणि नंतर शिवसेना शाखेसमोर फटाके फोडल्याच्या कारणावरुन पोलीस व शिवसैनिक यांच्यात तुफान राडा झाला. पोलिसांनी शिवसैनिकांवर निर्दयीपणे लाठीमार केला. त्यात रूपेश राऊळ-राजू शेट्ये यांच्यासारख्या शिवसैनिकांची डोकी फुटुन रस्त्यावर रक्ताचा सडा पडला आणि त्यावेळी शिवसैनिकांच्या रक्षणाखातर पोलिसांवर धावुन जाणारा वैभव नाईक संपुर्ण जिल्ह्याने पाहिला. राजकारणाच्या बाबतीत मारणारा कार्यकर्ता असतो आणि मार खाणाराही कार्यकर्ता असतो, असे उपहासाने म्हटले जाते. कणकवलीतील आमनेसामने राड्यात कार्यकर्त्यांसोबत मारणारा आणि पोलीसांचा मार खाणारा नेता जनतेने पाहिला. अशा प्रकारे नारायण राणेंच्या अरेला कारे करण्याची क्षमता असणारा तरुण तडफदार नेता अशी नवीन ओळख कणकवलीतील आमने-सामने राड्यानंतर वैभव नाईकांना मिळाली.
वैभव नाईक आमदार बनल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डंपर व्यावसायिकांचे सर्वपक्षीय आंदोलन सुरु असताना सर्व आंदोलक गेटकडे एकवटले होते. जिल्हाधिकारी महोदयांच्या दालनात एका लोकप्रतिनिधीने स्टंटबाजी केल्यामुळे पोलीसांनी सर्व आंदोलकांवर बेछूट लाठीमार सुरु केला. तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक देखील लाठीमार करण्यात आघाडीवर होते. पोलीसांनी लाठीमार सुरु केल्यानंतर आंदोलकांची पळापळ सुरु झाली. जिल्हाधिकारी महोदयांच्या दालनासमोर स्टंटबाजी करण्यासाठी गेलेले तथाकथित लोकप्रतिनिधी पोलीसांचा रूद्रावतार पाहुन रडवेला चेहरा करून कार्यकर्त्यांच्या मागे लपले. मात्र पोलीस लाठीमार करत असताना संघर्षाच्या पावित्र्यात असलेले वैभव नाईक आपल्या जागेवरच ठामपणे उभे राहिले. त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या लाठ्या झेलल्या, त्यांच्या पायावर व मांडीवर काठीचे वळ उठले परंतु त्यांनी शेवटपर्यंत मैदानातून पळ काढला नाही. त्यांचा लढाऊ बाणा पुन्हा एकदा समस्त जिल्हावासियांनी अनुभवला. अगदी अलीकडेच केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवण्यासाठी शिवसेना वर्धापनदिनी वैभव नाईकांनी कुडाळच्या पेट्रोल पंपावर शंभर रुपयांत दोन लीटर पेट्रोलची ऑफर जनतेला दिली. त्यांच्या या ऑफरला विरोधकांनी विरोध दर्शवला आणि जिल्ह्यातले राजकीय वातावरण एकाएकी पेटले. कुडाळ येथील पेट्रोल पंपावर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते जमा झाले. त्यावेळी शिवसैनिकांसोबत वैभव नाईक स्वतः रस्त्यावर उतरले परंतु त्यांना आव्हान देणारे विरोधी पक्षातील नेते कार्यकर्त्यांना घटनास्थळी पाठवून स्वतः मात्र फरार झाले. किंबहुना हाच महत्वाचा फरक आहे आमदार वैभव नाईक व त्यांच्या राजकीय विरोधकांमध्ये…! खरं तर संघर्ष आणि वैभव हे शब्द व्यावहारिक जगात कधीच एकत्र येत नसतात. जिथे संघर्ष असतो तिथे वैभव नसते आणि जिकडे वैभव असते त्यांना कधीच संघर्ष पाहावा लागत नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणाचा विचार केला असता संघर्ष व वैभव हे दोन्ही शब्द समानार्थी वाटावेत की काय एवढा प्रचंड संघर्ष आजपर्यंत एकट्या वैभव नाईकांच्या वाट्याला आला आहे. संघर्ष हा त्यांच्या पाचवीलाच पुजलेला आहे. किंबहुना आमच्यासाठी संघर्षाचे दुसरे नावच वैभव नाईक आहे…! एकंदरीतच त्यांच्या कारकिर्दीचा विचार केला असता साक्षात संघर्षालाही लाजवेल अशी त्यांची किमया आहे. आज त्यांच्या वाढदिवशी मी त्यांना खुप खुप शुभेच्छा देतो. परमेश्वर त्यांना उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य देवो, हीच त्याच्या चरणी प्रार्थना करतो.