*राजन तेली यांचा त्यावेळीचा दहशतवादाचा आरोप खोटा होता का?*
*सहकार समृद्धी पॅनलचे पतसंस्था मतदार संघाचे उमेदवार सुशांत नाईक यांचा सवाल*
*तेलींच्या दोन वेळच्या पराभवाची परंपरा यानिवडणुकीतही कायम ठेवणार**कणकवली ः प्रतिनिधी*सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात दहशतवाद येऊ नये याकरिता सहकार समृद्धी पॅनल शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने या निवडणुकीत लढत आहे. मात्र शिवसेनेचे नेते दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करतात असे सांगणारे भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांना अचानक नितेश राणे यांच्या राजकीय दहशतवादाची उपरती कशी काय झाली? जिल्हा बँक निवडणुकीच्या तोंडावर महा विकास आघाडी च्या पॅनेलमध्ये दहशत पसरविण्यासाठी महाविकास आघाडीचे प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यानंतर राजन तेली हे आता दहशतवाद हा एकच मुद्दा शिवसेना नेते घेतात असा आरोप करत आहेत. परंतु याच राजन तेली यांच्या मुलावर ज्यावेळी मुंबई हल्ला झाला त्यावेळी या राजन तेली यांनी स्वाभिमान संघटना व नितेश राणे यांच्यावर केलेल्या आरोपांना तेली विसरले का? की मागील पाच वर्ष राजन तेली यांचं निव्वळ दहशतवादाचे आरोप करणे हे एक नाटक होते? हे त्यांनी आता जाहीर करावं असे आव्हान महाविकास आघाडीचे पतसंस्था मतदार संघाचे उमेदवार सुशांत नाईक यांनी दिले आहे. राजन तेली यांनी काल पत्रकारांशी संवाद साधताना शिवसेनेच्या काही नेत्यांची नावे घेत त्याच्यावर टीका केली. मात्र संतोष परब वर झालेल्या हल्य्या सारखा हल्ला तेली च्या मुलांना सहन करावा लागला. त्यावेळी राजन तेली यांनी स्वाभिमान संघटना व नितेश राणे यांचे नाव घेतले. मात्र आज पक्षात राहून नितेश राणे यांच्या दहशतीच्या विरोधात राजन तेली यांची बोलण्याची हिंमत होत नसावी असा टोला श्री नाईक यांनी लगावला आहे. संतोष परब यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांनी हल्ला केल्यानंतर आपल्याला आमदार नितेश राणे व गोट्या सावंत यांना कळवले पाहिजे असे उद्गार घटनास्थळी काढले. तसा जबाब परब यांनी दिला. कणकवली पोलिसांनी त्याच दिवशी चार आरोपीना अटक सुद्धा केली. त्यानंतर काही दिवसांनी पाचव्या आरोपीला ताब्यात घेण्यात आले. हा पाचवा आरोपी हा स्वाभिमान संघटनेचा कार्यकर्ता असल्याचेही समोर आले आहे. मग आता तेली आपल्या मुलावर झालेल्या हल्ल्यात स्वाभिमान संघटनेचे कार्यकर्ते व आमदार नितेश राणे यांच्यावर करत असलेल्या आरोप हे खोटे होते का? हे तेली जाहीर करतील का? असा सवाल सुशांत नाईक यांनी केला आहे. दहशतवादा विरोधात राजन तेली गप्प का बसले त्यांच्या मुलावर झालेल्या हल्ल्याचा प्रसंगी राजन तेली यांनी घेतलेली भूमिका ते आता का घेऊ शकले नाहीत यातूनच तेली नितेश राणे यांच्या दबावाखाली काम करतात हे स्पष्ट होते असा टोलाही श्री नाईक यांनी लगावला. संतोष परब यांच्यावरील हल्ल्याचे पुणे कनेक्शन उघड झाले. दिल्लीमध्ये लपून बसलेल्या पुणे येथील फरार आरोपी कट्टर राणे समर्थक सचिन सातपुते यांना सिंधुदुर्ग पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. सचिन सातपुते हा स्वाभिमान संघटनेचा सदस्य असून त्यांचे राणे कुटुंबियांशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. नारायण राणे, निलेश राणे व नितेश राणे यांच्यासोबत असलेले त्यांचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. सचिन सातपुतेच्या अटकेनंतर संतोष परब यांच्यावर हल्ला करणारा मुख्य सूत्रधार कोण आहे हे सांगण्यासाठी कुणा ज्योतिषाची गरज नाही. पक्षाचे काम प्रामाणिकपणे पार पाडणाऱ्या एका शिवसैनिकावर जीवघेणा हल्ला झालेला असताना शिवसेना नेत्यांनी मुग गिळून गप्प बसायचे अशी तेलींची अपेक्षा आहे का…? राजकारणातील राडेबाज प्रवृत्तीविरोधात आवाज उठवणे म्हणजे राजकीय दहशतवादाचा बागुलबुवा करणे नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकार क्षेत्र रक्तरंजित होऊ नये म्हणून शिवसेनेची ही लढाई आहे. शिवसेनेची लढाई कोणत्याही व्यक्ती अथवा पक्ष यांच्या विरोधात नसून जिल्ह्यातील राजकारणात शिवरामभाऊ जाधव, भाईसाहेब सावंत, केशवराव राणे, डी बी ढोलम यांची परंपरा सांगणाऱ्या सहकार क्षेत्रात दहशतवाद माजविणाऱ्या अपप्रवृत्ती विरोधात आहे. १७ जानेवारी २०१७ रोजी राजन तेलींचा मुलगा प्रथमेश तेली याला रात्री अकरा वाजता दादर स्टेशनवर कोकणकन्या एक्स्प्रेसखाली ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळी एका टीव्ही वाहिनीला प्रतिक्रिया देताना राजन तेली असे म्हणाले होते की, “ज्या हल्लेखोराने प्रथमेश तेलीला चालत्या ट्रेनखाली ढकलून देण्याचा प्रयत्न केला, त्याने आपल्याला नितेश राणेंनी असे करायला सांगितल्याचे कबुल केले आहे. प्रथमेश तेलींवर हल्ला करणारे चारही जण हे स्वाभिमान संघटनेशी संबंधित आहेत. पाच वर्षांपूर्वी त्याच तारखेला दिनांक १७ जानेवारी २०१२ रोजी स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रथमेश तेली त्यावेळी शिकत असलेल्या सिडनेहॅम कॉलेजजवळ त्याच्यावर हल्ला केला होता. त्यावेळी त्याला रक्ताने माखलेला शर्ट गिफ़्ट म्हणून पाठवण्यात आला होता.”मग तेव्हा राजन तेली राजकीय दहशतवादाचा बागुलबुवा करत होते का? त्यावेळी राजन तेलींनी आमदार नितेश राणेंवर मुलावर हल्ला केल्याचे खोटे आरोप करून जनतेची फसवणूक केली होती का? या सर्व गोष्टींचे स्पष्टीकरण त्यांना आता द्यावेच लागेल. जर राजन तेलींनी चार वर्षांपूर्वी नितेश राणेंवर केलेले आरोप खरे असतील तर संतोष परबांवर हल्ला केल्याप्रकरणी शिवसेना नेते नितेश राणेंवर करत असलेले आरोप खोटे कसे मानायचे.? राहिला प्रश्न जिल्हा बँक निवडणुकीचा, आमदार नितेश राणे यांनी जरी दहशतवाद निर्माण करून मतदारांना कितीही घाबरवण्याचा प्रयत्न केला तरी महाविकास आघाडी च्या सर्व उमेदवारांना मतदार पसंती देत भरघोस मतांनी निवडून देतील असा विश्वास सुशांत नाईक यांनी व्यक्त केला आहे. आतापर्यंत दोन वेळा जिल्हा बँक निवडणुकीत तेलीना मतदारांनी पराभूत केले. त्यामुळे राजन तेली यांना जिल्ह्यातील जिल्हा बँकेचे मतदार स्वीकारत नाहीत हे दोन वेळा मतदारांनी दाखवून दिले आहे. व तीच राजन तेली यांच्या पराभवाची परंपरा या निवडणुकीत देखील मतदार कायम ठेवतील असा विश्वास सुशांत नाईक यांनी व्यक्त केला आहे. सहकार समृद्धी पॅनल हे शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या व सभासदांच्या विश्वासावर जिल्हा बँक निवडणुकीला सामोरे जात आहे. मात्र भाजपाकडून जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दहशत निर्माण करण्याचा होत असलेला प्रयत्न सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदार कदापिही स्वीकारणार नाहीत. त्यामुळे मतदार सुज्ञ आहेत हे राजन तेली यांनी विसरू नये. असा टोलाही श्री नाईक यांनी लगावला आहे.