*कोकण Express*
*कबुलायतदार गावकर जमीन वाटप क्रांतिकारी ऐतिहासिक निर्णय लवकर होईल; मंत्री अब्दुल सत्तार*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
शासनाने जांभा दगड बंदी उठवली असून लवकरच वाळू लिलाव निर्णय देखील होईल असा विश्वास महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला. दरम्यान आंबोलीच्या निसर्ग सौंदर्य, धबधबे ही देणगी आहे त्यामुळे लोकांना फायदा मिळायला हवा असे ते म्हणाले.
दरम्यान आंबोली गेळे येथील कबुलायतदार गावकर जमीन वाटप क्रांतिकारी ऐतिहासिक निर्णय लवकर होईल असा विश्वास त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. आंबोली येथे कबुलायतदार गावकर जमीन प्रश्न चर्चा करण्यासाठी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार आले होते. यावेळी आमदार दीपक केसरकर, जिल्हाप्रमुख संजय पडते व तालुकाप्रमुख रूपेश राऊळ उपस्थित होते.
यावेळी पत्रकार परिषदेत राज्यमंत्री सत्तार म्हणाले, आंबोली व गेळे येथील जमिनी शेतकऱ्यांना वाटप करण्यासंदर्भात अंतिम निर्णय लवकरच होणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री आणि शासन सरकार सकारात्मक आहेत. आमदार दीपक केसरकर यांची चिकाटी फळाला येईल असे ते म्हणाले.
आंबोली बाजारपेठ वन लागली आहे. तो प्रश्न देखील लवकरच मार्ग काढला जाईल आंबोली चे पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी जमिनी नावावर झाल्यानंतर फायदा होईल केंद्र व राज्य सरकारचे निधी देखील लोकांना वापरता येईल असे ते म्हणाले. या जमिनी वाटप करताना डीपी प्लॅन तयार होणार आहे. शासनाच्या योजनांसाठी जमीन ठेवून अन्य जमिनी समान पद्धतीने लोकांना वाटप केल्या जातील शासनाच्या शासकीय कार्यालय शाळा आरोग्य विभाग यासाठी जमिनी लागणार आहे. त्या ठेवल्या जातील असे ते म्हणाले.
येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये या प्रश्नाबाबत निर्णय अपेक्षित आहे, असे देखील मंत्री म्हणाले. जमीन प्रश्न हा क्रांतिकारी ऐतिहासिक निर्णय आहे. शेतकऱ्यावर अन्याय होऊ दिला जाणार नाही, असे ते म्हणाले. चौकुळ जमीन वाटप संदर्भात समिती स्थापन करून लोक निर्णय देतील आणि या प्रस्तावाला नंतर शासन सकारात्मक विचार करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वने या जमिनी देखील खाजगी वने आहेत. या जमिनी देखील शेतकऱ्यांना मिळण्याबाबत प्रयत्न सुरू आहे, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर या दौऱ्याचा अहवाल ठेवून जमीन वाटप बाबत पुढील निर्णय होईल, असे त्यांनी सांगितले.
