किरण सामंत महिना १ कोटी ८० लाख अनधिकृत पर्ससिनेट, एल.ई.डी. धारकांकडून वसुली करतो जमा

किरण सामंत महिना १ कोटी ८० लाख अनधिकृत पर्ससिनेट, एल.ई.डी. धारकांकडून वसुली करतो जमा

*कोकण Express*

*किरण सामंत महिना १ कोटी ८० लाख अनधिकृत पर्ससिनेट, एल.ई.डी. धारकांकडून वसुली करतो जमा…!*

*आमदार नितेश राणे यांनी मत्स्योद्योग मंत्री अस्लम शेख यांच्याकडे केली होती पूर्वीच तक्रार…!*

*“किरण सामंत कोकणचा वाझे कसा” हे केले होते स्पष्ट, २५ मार्च रोजीचे “ते” पत्र माध्यमांसमोर…!*

*कणकवली ः प्रतिनिधी*

अनधिकृत पर्ससिनेट व एल.ई.डी. धारक मच्छीमारांकडून दरमहा १० हजार रूपये प्रमाणे १ कोटी ८० लाख रूपये वसूल करण्याचे काम रत्नागिरी येथील किरण रविंद्र सामंत हे उघडपणे करीत आहेत, अशी लेखी तक्रार भाजपा आमदार नितेश राणे यांनी मत्स्योद्योग मंत्री अस्लम शेख यांच्याकडे केली होती. पालकमंत्र्यांचे बंधू किरण सामंत कोकणातील दुसरे सचिन वाझे अशी टीका आम.राणे यांनी पत्रकार परिषदेत केल्या नंतर हे तक्रारींचे पत्र व्हायरल होऊ लागले आहे.

पालकमंत्री याचे बंधू किरण सामंत यांच्या विरुद्ध आम.नितेश राणे यांनी केलेला पत्रव्यवहार आणि दिलेले पुरावे जनतेसमोर येऊ लागले आहेत. अनधिकृत पर्ससिनेट व एल.ई.डी. धारकांकडून किरण सामंत कसे पैसे वसूल करतात याचा लेखा जोखा आम.राणे यांनी मत्स्योद्योग मंत्री अस्लम शेख यांना दिला होता.त्या पत्रात त्यांनी म्हटले होते,

कोकण किनारपट्टीवर अनधिकृतरित्या होत असलेल्या मच्छीमारीबाबत विशेषतः रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ल्यामधील पारंपारिक मच्छीमार सद्या फार मोठ्या संघर्षाद्वारे आपला निषेध वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त करीत आहेत . पारंपारिक मच्छीमार व पर्ससिन मच्छीमार हा वाद जरी जुना असला , तरी सधा हा वाद उफाळून येण्यामागे शासन निर्मित चाललेला भ्रष्टाचार हे एक कारण असल्याचे मला समजते . याबाबत सिंधुदुर्ग व रत्नागिरी येथील मत्स्य विभागातील काही अधिकारी व मच्छीमार यांचेकडून माहीती घेतली असता आपल्या खात्यामध्ये उघडपणे चाललेल्या भ्रष्टाचाराची धक्कादायक माहीती समोर आली आहे. यासंदर्भात आमदार नितेश राणे यांनी मत्स्योद्योग मंत्री अस्लम शेख यांच्याकडे 25 मार्च 2021 रोजी तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीचे पत्र आता व्हायरल झाले आहे.

या पत्रात म्हटले आहे, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकूण ३१५ अधिकृत पर्ससिनेट मच्छीमारांना परवाना देण्यात आली आहे. परंतु, सद्या १५०० अनधिकृत पर्ससिनेट धारक तसेच ३०० एल.ई.डी. धारक बेकायदेशीररित्या दोन्ही जिल्ह्यांमध्ये मच्छीमारी करीत आहेत. या अनधिकृत पर्ससिनेट व एल.ई.डी. धारक मच्छीमारांकडून दरमहा १० हजार रूपये प्रमाणे १ कोटी ८० लाख रूपये वसूल करण्याचे काम रत्नागिरी येथील किरण रविंद्र सामंत हे उघडपणे करीत आहेत असे समजते. त्यासाठी अधिकाऱ्यांना वेठीला धरून प्रसंगी दबाव टाकून या वसूलीच्या कामाला जुपले जात आहे. श्रीमती रश्मी अवुलकर नावाच्या अधिकाऱ्याने ६० अनधिकृत पर्ससीन धारकांवर कारवाई केली असता , त्यांची बदली अमरावती येथे करण्यात आली. अशी माहीती आपल्या खात्यातील अधिकाऱ्यांकडून समजते . त्यामुळे अनधिकृत मच्छीमारी विरूद्ध कारवाई करण्यास अधिकारी वर्ग तयार होत नाहीत. व यामुळेच संघर्ष निर्माण झाला आहे. अशा प्रकारे आपल्या खात्यामध्ये राजरोस बेकायदा वसूलीचा प्रकार चालू आहे. त्याची दखल घेऊन या भ्रष्टाचाराच्या मुळाशी आपण पोहचाल का ? हा मोठा प्रश्न आहे. याबाबत आपण वेळीच दखल घेऊन चौकशी करून संबंधित बेकायदा हप्ते वसूल करणाऱ्यांविरोधात लवकरच कारवाई करावी. अन्यथा कोकण किनारपट्टीवर पारंपारिक मच्छीमारांचा संघर्ष हा हिंसक मार्गावर जाईल व याची संपूर्ण जबाबदारी शासनाची राहील, तरी त्वरीत कारवाई करावी अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी मत्स्य उद्योग मंत्री असलम शेख यांच्याकडे निवेदनाद्वारे मार्च महिन्यामध्ये केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!