*कोंकण एक्सप्रेस*
*बेजबाबदार गुरांच्या मालकांवर कारवाई करा!*
*उभादांडा येथील शेतक-यांची मागणी*
*वेंगुर्ला ः प्रथमेश गुरव*
उभादांडा परिसरात गुरांमुळे शेतीचे अतोनात नुकसान होत आहे. तसेच मोकाट फिरणा-या या गुरांमुळे रात्री अपरात्री वाहनधारकांनाही त्याचा त्रास होत आहे. त्यामुळे संबंधित गुरांच्या बेजबाबदार मालकांवर कारवाई करण्यात यावी अशा प्रकारचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते कार्मिस आल्मेडा यांच्या नेतृत्वाखाली काही शेतक-यांनी वेंगुर्ला पोलिस निरीक्षक यांच्याकडे केली आहे.
त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, उभादांडा गावात काही बेजबाबदार गुरांचे मालक आपली गुरे दिवसा तसेच रात्रीचीसुद्धा सोडून देत आहेत आणि ही गुरे शेतामध्ये शिरून भाजीपाला खाऊन शेतक-यांचे नुकसान करीत आहेत. याबाबत संबंधित गुरांच्या मालकांना याबाबत सांगितले असता शेतक-यांनाच दमदाटी करून ती गुरेही आमची नसल्याचे सांगण्यात येत आहे. या गुरांचा त्रास वाहनधारकांनाही होत आहे. काही दिवसांपूर्वी या भटक्या गुरांमुळे मोटरसायकल स्वाराला आपला हात गमवावा लागला आहे. या घटना रोज घडत असून बेजबाबदार गुरांचे मालक दुध काढण्यासाठीच गुरांचा उपयोग करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. दरम्यान, वाहनधारकाकडून गुरे जमखी झाल्यास त्याच्याकडून पैशाचीही मागणी केल्याचे प्रकार घडले आहेत. हे प्रकार थांबण्यासाठी पोलिसांनी बेजबाबदार गुरांच्या मालकांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
निवदेन सादर करताना जयप्रकाश चमणकर, दादा नाईक, कार्मिस आल्मेडा, मोजेस आल्मेडा, क्लेबीन आल्मेडा, घाब्रु आल्मेडा, मारूती मांजरेकर आदी उपस्थित होते.
फोटोओळी – बेजबाबदार गुरांच्या मालकांवर कारवाई करण्यासाठी उभादांडा येथील शेतक-यांनी वेंगुर्ला पोलिसांना निवेदन दिले.